73 व्या वर्षी 21 दिवस उपवास; ब्रिटिशांनीही केली होती 'गांधीजींच्या मृत्यूची तयारी'

    • Author, उर्विश कोठारी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी गुजरातीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमधील तीव्र आंदोलन आणि उपोषणाच्या निमित्ताने महात्मा गांधींच्या उपोषणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

काही जणांनी तर सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर टीका केली आहे. त्या लोकांनी महात्मा गांधींचे उपोषण म्हणजे नाटक आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार होते असे म्हटले आहे.

तर काही लोकांचं असं मत आहे की, तेव्हाची इंग्रज राजवट ही भारताची शत्रू होती म्हणून गांधीजींनी उपसलेले उपोषणाचे शस्त्र ही यशस्वी रणनीती होती. असं करताना अनेकांनी ऐतिहासिक तथ्यांकडे कानाडोळा केल्याचे दिसते.

गांधीजींच्या उपोषणाचे ऐतिहासिक वास्तव हे निराळे होते. 1915 साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यापासून ते 30 जानेवारी 1948 पर्यंत म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत महात्मा गांधींनी 30 हून अधिक उपोषणं केली होती.

'गांधीजींची दैनंदिनी' या विश्वसनीय संदर्भ पुस्तकाचे संपादक चंदूलाल दलाल यांनी गांधीजींच्या उपोषणांची नोंद ठेवली आहे. त्यांची सर्वच उपोषणं ही पूर्वघोषित नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गांधीजींची उपोषणं ही 1 दिवसापासून ते 21 दिवसापर्यंतची मुदतीची होती. उल्लेखनीय बाब म्हणजे महत्त्वपूर्ण उपोषणं ही ब्रिटिश राजवटीवरिोधातच होती.

राजसत्तेविरोधात उपोषण करणे म्हणजे सत्याग्रहातील शेवटचा टप्पा असं गांधीजी मानत. त्यातले उपोषणं अशी देखील आहेत ज्यात त्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील तर प्रायश्चित्त म्हणून उपोषण केलं आहे.

आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या चुकांसाठी ते स्वतःला अपराधी मानत असत. त्यांच्या उपोषणाचा आणखी दुसरा उद्देश म्हणजे धार्मिक एकतेसाठी ते उपोषण करत. आंदोलनाच्यावेळी लोकांनी केलेल्या हिंसेच्या निषेधार्थही ते उपोषण करत असत.

गांधीजींनी 1924 मध्ये पहिल्यांदा 21 दिवसांचे उपोषण केले होते. हे उपोषण हिंदू-मुस्लीम एकतेसाठी होते.

त्यांची हत्या होण्याच्या 2 आठवडे आधी ते हिंदू-मुस्लीम एकतेसाठी आमरण उपोषणाला बसले होते. काही दिवस आधीच त्यांनी उपोषण सोडले होते.

गांधीजींचे सर्वांत वादग्रस्त उपोषण हे 1932 मध्ये त्यांनी येरवडा तुरुंगात केलेले उपोषण आहे.

तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानांनी दलितांसाठी वेगळे मतदारसंघ घोषित केले होते. त्याविरोधात त्यांनी हे उपोषण केले होते.

त्यांनी उपोषण सोडून त्यांचे प्राण वाचावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि हिंदू नेत्यांसह पुणे करार केला.

या करारामुळे दलितांना वेगळे मतदारसंघ मिळण्याऐवजी राखीव जागा मिळाल्या. आधीच्या रचनेत दलितांना वेगळे मतदारसंघ होते ज्यात केवळ दलित हे केवळ दलितांना मतदान करू शकत होते.

तसं पाहायला गेलं तर हे उपोषण ब्रिटिशांविरोधात आहे अशी घोषणा केली असली, तरी हे उपोषण ब्रिटिशविरोधी म्हणून पाहिलं गेलं नाही. कारण या त्यांच्या उपोषणाचा परिणाम दलितांच्या हक्कांवर झाला.

याच वर्षी अप्पासाहेब पटवर्धनांनी सत्याग्रह केला होता. तुरुंगात मैला सफाई कामगारांसह काम करण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केले होते.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी अप्पासाहेब पटवर्धनांनी पूर्णपणे अन्नत्याग केला. पटवर्धन हे गांधीजींचे अनुयायी होते.

एक दलितेतर व्यक्ती अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य करतेय हे पाहून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गांधीजींनी देखील 3 डिसेंबरला उपोषण सुरू केले. पण इंग्रज सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याचे वचन दिल्यावर गांधीजींनी आपले उपोषण सोडले.

त्यानंतर त्यांनी केलेले उपोषण हे देखील अस्पृश्यता निवारणासाठी आणि दलितांच्या सेवेसंदर्भातच होते.

गांधीजींनी या मुद्द्यांवर काम करण्याची परवानगी ते तुरुंगात असताना इंग्रज सरकारने दिली होती. कारण ते एक राजकीय बंदी आहेत असं सरकारचं म्हणणं होतं.

पण 1933 मध्ये ब्रिटिश सरकारने अशा प्रकारची परवानगी त्यांना तुरुंगात असताना दिली नव्हती.

त्यामुळे गांधीजींनी बॉम्बे प्रांताच्या तत्कालीन गृह सचिवांना लिहिले होते, "मी जे करत आहे ते मी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य हाती घेतले आहे त्याचा एक केवळ एक भाग आहे. येरवड्यातील पुणे करारावेळी मी अस्पृश्यता निवारणासाठी माझ्या मनात जी प्रतिज्ञा घेतली आहे त्याचाच हा एक भाग आहे."

"हे कार्य माझ्या जीवनाच्या बलिदानाशिवाय थांबवले जाऊ शकत नाही..." ( 4 ऑगस्ट 1933) जेव्हा गांधीजींच्या मागण्यांकडे ब्रिटिशांनी वारंवार दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांनी 16 ऑगस्टला आपले उपोषण सुरू केले.

या उपोषणावेळी त्यांची तब्येत खालावू लागली होती. 20 ऑगस्टला त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

त्यानंतर देखील त्यांची तब्येत खालावू लागली होती. तेव्हा गांधीजींनीच आपल्या जगण्याची आशा सोडली होती.

21 ऑगस्टला कस्तुरबा या गांधीजींना भेटायला आल्या. जसा मृत्यू जवळ येतोय असं गांधीजींना वाटत होतं तसं त्यांच्या वैयक्तिक वस्तू रुग्णालयाच्या स्टाफमध्ये वितरित करण्यात आल्या. पण गांधीजींची स्थिती खूपच खराब झाली.

23 ऑगस्टला सरकारने त्यांची सुटका केली. त्यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.

खोटे आरोप आणि जीव धोकादायक स्थितीत जाणे

डिसेंबर 1933 मध्ये गांधीजी लिहितात, "उपवास करणे हे माझ्यासाठी नित्याची गोष्ट बनली आहे. भले मला ते आवडो वा ना आवडो. त्यात काय नुकसान आहे?"

"उपवासाबद्दल एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की, माझ्यासाठी उपवास हा आयुष्याचा भाग आहे. त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की, माझ्या शरीराबाबतचा माझा मोह नष्ट व्हावा... " (गांधीजींचे साहित्य -गुजराती- गांधीजी नो अक्षरदेह - खंड -55 - पान क्रमांक 393) हे लिहिल्याच्या 10 वर्षांनंतर पुन्हा गांधीजी हे उपोषणाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.

1942 मध्ये भारत छोडो आंदोलनावेळी अनेक मोठ्या काँग्रेस नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. या आंदोलनावेळी काही ठिकाणी हिंसाचार देखील पाहायला मिळाला.

त्यामुळेच ब्रिटिश सरकारने गांधीजी आणि काँग्रेसला त्यावेळच्या गोंधळासाठी आणि हिंसेसाठी जबाबदार धरले होते.

ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांच्याप्रमाणेच व्हाइसरॉय लिनलिथगो हे देखील गांधीजींचा तितकाच दुस्वास करायचे.

त्यांना असं वाटायचं की, या अस्थिरतेसाठी गांधीजीच जबाबदार आहेत. गांधीजी आणि व्हॉइसरॉय यांच्यात दीर्घकाळासाठी पत्रव्यवहार झाला.

गांधीजी यांनी व्हॉइसरॉयला लिहिलं होतं की, जर ते त्यांच्यावरील आरोप सिद्ध करू शकले, तर ते स्वतः (गांधीजी) आपली चूक कोणतीही आडकाठी न ठेवता मान्य करतील. तसं नसेल तर त्यांच्यावरील सर्व दोष व्हॉइसरायांनी मागे घ्यावेत.

व्हॉइसरॉय यांच्या दबावाला न झुकता गांधीजींनी पुण्यातील आगा खान पॅलेस (इथे गांधीजींना अटकेत ठेवले होते) या ठिकाणी 73 व्या वर्षी 21 दिवसांच्या उपोषणाची घोषणा केली.

त्यांचे त्यावेळचे वय आणि तब्येत पाहता या गोष्टीशी शक्यता कमीच होती की, गांधीजी यशस्वीपणे 21 दिवसांचे आपले उपोषण पूर्ण करतील.

गांधीजींच्या देखभालीसाठी काँग्रेसचे नेते आणि सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गिल्डर यांना बोलवण्यात आले होते. त्यावेळी भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते दुसऱ्या तुरुंगात होते.

डॉ. सुशिला नायर देखील त्यांच्यासोबत होत्या. ब्रिटिश डॉक्टर मेजर जनरल कँडी हे देखील गांधीजींच्या तब्येतीबाबत विशेष काळजी घेत होते.

10 फेब्रुवारीला गांधीजींनी उपोषण सुरू केले. काही काळानंतरच त्यांची स्थिती खालावू लागली होती. मेजर जनरल कँडी यांनी गांधीजींच्या सहकाऱ्यांना आग्रह केला की, त्यांच्या पाण्यात ज्युस मिसळून त्यांना देण्यात यावे. अन्यथा ते जगणार नाहीत.

पण गांधीजींकडून सूचना आल्याशिवाय हे पाऊल उचलण्यासाठी कुणीही तयार नव्हते. गांधीजींना पाणी पिण्यास देखील त्रास होऊ लागला होता. त्यांच्या श्वासातून अ‍ॅसिटोन आणि युरेमियाचा गंध येऊ लागला होता. त्यांच्या किडनीला नुकसान होत असल्याचे हे निदर्शक होते.

21 फेब्रुवारीला गांधीजींनी डॉ. सुशिला नायर यांची सूचना मान्य केली. डॉ. सुशिला नायर यांनी याबाबत म्हटले आहे की, गांधीजींनी या गोष्टीला आधीच मान्यता दिली होती की, जर त्यांना पाणी पिता येत नसेल तर त्यासोबत मोसंबीचा रस मिसळून देता येईल. ( बापूज स्टोरी ऑफ इप्रिजनमेंट pp-278-9)

जेव्हा त्यांची तब्येत पुन्हा स्थिर होऊ लागली तेव्हा त्यांनी पुन्हा पाण्यातील ज्यूसचे प्रमाण कमी केले. डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यांची तब्येत खालावू लागली होती आणि डॉक्टरांना त्यांची काळजी वाटू लागली होती. पण त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली नाही.

गांधीजींच्या मृत्यूची ब्रिटिश सरकारने केली तयारी

गांधीजींच्या उपोषणावेळी केवळ भारताच्या व्हॉइसरॉयने नाही, तर ब्रिटिश सरकारने त्यांच्या मृत्यूची तयारी केली होती.

गांधीजींच्या जवळच्या सहकारी मीरा बहन यांनी त्यांच्या संस्मरणात लिहिले आहे की, हे आम्हाला नंतर लक्षात आले की सरकारने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुखड (चंदन) आणि इतर लाकडाची व्यवस्था केली आहे.

तसेच अंत्ययात्रा कुठून जाईल याचे नियोजन देखील त्यांनी केले होते. त्याच वेळी सरकारी अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या होत्या की, या काळात अत्यंत सावधगिरी बाळगा आणि त्यांच्या मृत्यूनंतर जर काही अस्थिरता निर्माण झाली, तर ती लगेच आटोक्यात आणा. ( जर्नी ऑफ अ सेज - pp. 234-5)

राजवटीविरोधात उपोषणाबाबत गांधीजी लिहितात, "जेव्हा सत्याग्रही परावलंबी अवस्थेत असतो, तेव्हा त्याच्यासाठी सत्याग्रहाचे इतर सर्व मार्ग बंद झालेले असतात. राजवटीकडून होणारा अन्याय त्याला इतका असह्य वाटतो की तो अन्याय सहन करत जगणे म्हणजे केवळ अर्थहीन अस्तित्व उरते, तेव्हा त्याने प्राणार्पणाची तयारी ठेवून उपोषण सुरू करावे."

गांधीजींनी त्यांच्या साहित्यात आणि पत्रांमध्ये वेळोवेळी उपोषणांबद्दल लिहिलं आहे. पण त्यांचे हे लिखाण वाचून आताच्या काळातील उपोषणांच्या स्थितीचे कौतुक करणे अथवा त्यांचा निषेध करणे हे अन्यायकारक ठरेल.

गांधीजींचे हे लिखाण केवळ त्यांचे विचार आणि निर्णय समजून घेण्यासाठी वापरायला हवे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)