संसद मोर्चाच्या परवानगीबाबत दिल्ली पोलिसांचा इशारा, नेमकं काय म्हटलं?

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील उपोषणाचा आज (19 जुलै) 22 वा दिवस आहे. सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करत इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले, "आम्ही स्पष्टपणे कळवू इच्छिते की, 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर काढण्यात येणाऱ्या कोणत्याही निषेध मोर्चासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही."

"नवी दिल्ली जिल्ह्यात बीएनएसएसच्या कलम 163 (पूर्वीचे सीआरपीसी कलम 144) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यानुसार जंतर-मंतर येथील निर्धारित निषेध स्थळावर पूर्वपरवानगी घेऊन केल्या जाणाऱ्या निदर्शनांशिवाय इतर ठिकाणी निषेध मोर्चे, मिरवणुका, आंदोलन आणि 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र जमणे यावर बंदी आहे," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

"20 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने सार्वजनिक सुरक्षितता, संरक्षित व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण सरकारी आस्थापनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

कारवाईचा इशारा देताना दिल्ली पोलीस म्हणाले, "या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर बीएनसचे कलम 223 आणि कायद्यातील इतर लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल."

"सर्व नागरिकांनी कायद्याचा आदर करावा, कोणत्याही अनधिकृत जमावात किंवा मोर्चामध्ये सहभागी होणं टाळावं आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करावं," असं आवाहनही दिल्ली पोलिसांनी केलं.

सोनम वांगचूक उपोषण कधी सोडणार? पत्नी गीतांजली अंगमो यांनी सांगितली तारीख

जंतरमंतर येथे सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सोनम यांच्या उपोषणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

त्या म्हणाल्या, "जर राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन सोनम यांची भेट घेतली आणि संसदेच्या अधिवेशनात शिक्षणाबाबतच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले, तर ते उद्या आपले उपोषण मागे घेतील."

'सर्वांनी 2 गोष्टी लक्षात ठेवा'

संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे.

त्या म्हणाल्या, "मी सर्वांना 2 गोष्टी लक्षात ठेवण्याचे आवाहन करते. पहिली गोष्ट म्हणजे हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण राहील याची आपण खात्री करूया. दुसरी गोष्ट मोर्चात व्यत्यय आणण्याचा किंवा चिथावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही समाजकंटकांपासून सावध राहा."

"जंतर-मंतरवर गेल्या 22 दिवसांमध्ये तरुणांनी हे दाखवून दिले आहे की, ते आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडू शकतात," असंही गीतांजली यांनी नमूद केलं.

दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांचं उपोषण या रविवारी (19 जुलै) दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.

गीतांजली अंगमो यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, त्या त्यांचे पती सोनम वांगचूक यांच्या वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात उच्च न्यायालयात गेल्या आहेत.

यादरम्यान, उपोषण करणं किती कठीण असतं, याची जाणीव आपल्याला आता झाली असल्याचं अभिजीत दिपके यांनी नमूद केलं आहे. तसेच, उपोषण करणाऱ्या इतरांबद्दलही त्यांनी आदर व्यक्त केलाय.

अभिजीत दिपके म्हणाले की, "आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे काम किती कठीण आहे, याची मला आता जाणीव झाली आहे. सोनम सर आणि इथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना मी सलाम करतो. उद्या होणाऱ्या पदयात्रेसाठी मी माझी ऊर्जा राखून ठेवत आहे."

यापूर्वी सोनम वांगचूक दिल्लीतील जंतरमंतर इथे उपोषण करत होते. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्यानंतर, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'ने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचे नियोजन केलं असून, लोकांना त्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, नागपुरात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आणि NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून नागपुरात मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळालं.

संविधान चौकातून निघालेल्या हजारो नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध केला.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, तरुणांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या लावून धरल्या.

वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांची उच्च न्यायालयात धाव

समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या पत्नी, गीतांजली जे. अंगमो यांनी सांगितलं आहे की, त्या आपल्या पतीच्या वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात उच्च न्यायालयात गेल्या आहेत.

सोनम वांगचूक यांची प्रकृती आणखी खालावण्यापूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी त्यांनी न्यायालयाकडे मागितली आहे.

गीतांजली यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये सफदरजंग सरकारी रुग्णालयातील सुविधांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

गीतांजली यांनी 'एक्स'वर पोस्ट केलंय, "माझा सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला आहे. रुग्णालयाने आम्हाला कळवले की वांगचूक यांची पोटॅशियमची पातळी 2.9 पर्यंत खाली आली होती. त्यांनी ही परिस्थिती चिंताजनक आणि जीवघेणी असल्याचे वर्णन केले, तरीही त्यांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये ती नेमकी पातळी उघड केली नाही."

त्यांनी पुढे लिहिले, "10 तासांनंतर आणि वारंवार विनंती केल्यानंतर, त्यांनी आम्हाला रात्री साडेदहा वाजता त्याचा रक्ताचा नमुना घेण्याची परवानगी दिली. एका स्वतंत्र प्रयोगशाळेतील चाचणीत पोटॅशियमची पातळी 3.5 असल्याचे दिसून आले, जी सामान्य मर्यादेत आहे."

"वारंवार विनंती करूनही, रुग्णालयाने त्याला डिस्चार्ज देण्यास किंवा आमच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिला आहे. आमच्या मजल्यावर सुमारे 30 आणि संपूर्ण रुग्णालयात 100 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यामुळे आमच्या हालचालींवर कडक निर्बंध आले आहेत. हा वैद्यकीय उपचार नाही, तर ही बेकायदेशीर स्थानबद्धता आहे."

गीतांजली यांनी लिहिले, "सोनमच्या बाबतीत काहीही अघटित घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल. म्हणूनच मी उच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.

सोनमची प्रकृती अधिक खालावण्यापूर्वी तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची परवानगी मिळावी, अशी मी विनंती केली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवर कुठे उपचार व्हावेत, हे ठरवण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेशी लढा द्यावा लागू नये."

विशेष म्हणजे, पोलिसांनी शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतरवरून सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात नेले. त्यानंतर, रविवारी एका संदेशात वांगचूक यांनी दावा केला की त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले आहे.

आंदोलनाविषयी अण्णा हजारे काय म्हणाले?

या आंदोलनाबाबत बीबीसीने अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले की, "सरकारने सलोख्याने चर्चा करावी. सलोख्याने प्रश्न सुटतात. सरकारची याबाबत भूमिका काय आहे, याची मला कल्पना नाही. पण सरकार आणि जनता वेगळी नाहीये. एकच आहे. शेवटी, जनतेसाठी सरकार असेल तर सलोखा असणं गरजेचं आहे. सलोख्यानेच प्रश्न सुटतात."

पुढे ते म्हणाले की, "सरकार आणि जनता यांच्यात मतभेद नसले पाहिजेत. सलोखा पाहिजे. सलोखा नसेल तर प्रश्न सुटणार नाहीत. मी एवढी आंदोलनं केली आहेत, पण सलोख्याने केली. जेव्हा दोन पावले मागे यायची वेळ आली तेव्हा आलो. ज्यावेळी हे पुढे न्यायची गरज वाटली, तेव्हा नेलंही."

या आंदोलनाबाबतची तुमची भूमिका काय, असं विचारला असता ते म्हणाले की, "तिथल्या आंदोलनाची भूमिका काय आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय बोलणं योग्य नाही."

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, "आपल्याला संपूर्ण बाजू समजल्याशिवाय मी बोलणार नाही," असं ते म्हणाले.

सोनम वांगचूक यांच्या तब्येतविषयी डॉक्टर काय म्हणाले?

शनिवारी (19 जुलै) सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्लीतील जंतरमंतरवरून सफदरजंग रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतचे वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलं.

सफदरजंग रुग्णालयाच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, सोनम वांगचूक यांनी 'आयव्ही' ड्रिपद्वारे किंवा तोंडावाटे द्रव पदार्थ घेण्यास नकार दिला.

दरम्यान, एम्स (AIIMS) दिल्लीच्या आपत्कालीन वैद्यकशास्त्र विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अक्षय, ज्यांनी त्यांची तपासणी केली, त्यांनी सांगितलं की त्यांचं आरोग्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे निकष सामान्य आहेत. ते पूर्णपणे शुद्धीवर असून योग्य प्रकारे संवाद साधत आहेत.

दुसरीकडे, सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी त्यांना लवकरात लवकर रुग्णालयातून घरी सोडण्याची मागणी केली आहे.

नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेच्या विरोधात सोनम वांगचूक यांनी 28 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं आणि त्याला आता 21 दिवस पूर्ण झाले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत, पोलिसांनी शनिवारी त्याला बळजबरीनं सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं.

सोनम वांगचूक यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

डॉक्टरांच्या हेल्थ बुलेटिनवर सोनम यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गीतांजली जे. अंगमो यांनी म्हटलं, "सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालानुसार सोनम वांगचूक यांच्या पोटॅशियमची पातळी 2.9 आहे, तर काल (20 जुलै) ती 4.3 होती. ते आम्हाला सेकंड ओपिनियन घेण्यासाठी सोनम यांना दुसऱ्या लॅबमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देत ​​नाहीत किंवा आमच्या उपस्थितीत रक्ताचा नमुनाही देत ​​नाहीत, जेणेकरून आम्ही तो इतरत्र तपासू शकू."

"मी गेल्या 3 तासांपासून वाट पाहत आहे, पण त्यांनी अजूनही आमचे ऐकलेले नाही. या पारदर्शकतेच्या अभावामुळे आमच्या मनात संशय निर्माण होत आहे. आम्ही त्यांना तात्काळ डिस्चार्ज देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आम्ही त्यांना अशा रुग्णालयात घेऊन जाऊ शकू ज्यांच्यावर आम्हाला अधिक विश्वास आहे."

रुग्णालयाच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक

सोनम वांगचूक यांना जंतरमंतर येथून हलवून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपण उपोषणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणा केली आहे.

'मी या क्षणापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करत आहे', असं त्यांनी एक्सवर जाहीर केलं.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनस्थळावरून आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

दुपारी अभिजीत दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याने आंदोलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अभिजीत दिपके उपस्थितांसमोर बोलत असताना अचानक ही घटना घडली.

शाई फेकल्यानंतर दिपके यांचे समर्थक तातडीने मंचाकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्यावर निळ्या रंगाची शाई फेकण्यात आली होती.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, या घटनेनंतर जंतर-मंतरवरील कार्यक्रम काही काळासाठी थांबवण्यात आला.

या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी निळ्या शाईला उद्देशून एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "निळा हा माझा रंग आहे, जय भीम!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)