You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेल्डिंग केलेल्या बॅरिकेड्स ते लाठीमार, अश्रुधूर; कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाची सुरुवात आणि शेवट कसा झाला?-ब्लॉग
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, जंतर मंतर, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरच्या मोर्चाला परवानगी मिळणार नाही हे मोर्चाची घोषणा झाल्यापासून स्पष्टच होतं. प्रश्न होता ते जाहीर कधी केलं जाईल हा. दिल्ली पोलिसांनी ते मोर्चाच्या आदल्या संध्याकाळी जाहीर केलं. इतकंच नाही तर लोकांनी अशा अनधिकृत मोर्चाला जाऊ नये असंही आवाहन केलं.
6 जूनला अभिजीत दिपकेंनी अमेरिकेतून भारतात येऊन जंतर मंतरवर केलेलं निदर्शन आणि 20 तारखेचं आंदोलन यात बराच फरक होता.
6 जूनच्या निदर्शनावर सर्रास विचारला गेलेला प्रश्न होता, 'इन्स्टाग्रामवर इतके फॉलोअर्स मग प्रत्यक्षात का येत नाहीत?' महिनाभरापेक्षा जास्त काळात या निदर्शनाचं आंदोलनात रुपांतर करण्यात 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि त्यांच्या टीमला बऱ्यापैकी यश आलं असं म्हणायला हवं.
पहिल्या आंदोलनाला जमलेली संमिश्र उपस्थिती आणि 20 जुलैच्या मोर्चाला जमलेल गर्दी याच्यात अनेक पटींची वाढ झाली होती. मोर्चा सकाळी 9 वाजता निघणार होता, पण पहाटेपासूनच नाही तर आदल्या रात्रीपासून अनेक लोक इथे तळ ठोकून होते.
इतके दिवस जंतर मंतरच्या मुख्य आंदोलनस्थळी जाताना मेटल डिटेक्टर्स, बॅरिकेड्स असं सगळं ओलांडून जावं लागायचं. पण मोर्चाच्या दिवशी हे सगळं गायब होतं.
या बॅरिकेड्स आता जंतर मंतरकडून संसद मार्गावर जाणाऱ्या वळणावर उभ्या होत्या. नुसत्या उभ्या नाही तर सकाळी वेल्डिंग करून वर एकमेकींना दोरखंडाने घट्ट बांधून ठेवलेल्या होत्या.
संसदेचं कुठलंही अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील याची चर्चा असते. पण यावेळी चर्चा संसदेबाहेरच्या विरोधकांची होती.
काँग्रेस वगळता बहुतांश विरोधी पक्षांनी आधीच या आंदोलनाला पाठिंबा किंवा सहानुभूती जाहीर केली होती. माझ्या मते काँग्रेससाठी ही परिस्थिती इकडे आड – तिकडे विहीर अशी होती.
पाठिंबा द्यावा आणि CJP ची मागणी मान्य व्हावी तर श्रेय पूर्ण त्यांना जातं, पाठिंबा न द्यावा आणि मागणी मान्य झाली तर प्रमुख विरोधी पक्षाशिवायही एक काल उगवलेली संघटना हे करून आणू शकते असं म्हणत टीका व्हायची. आणि मागणी मान्य नाहीच झाली तर काँग्रेसने पाठबळ देऊनही काही झालं नाही असं बोललं जाणार.
असो, पुन्हा एकदा जंतर मंतर आणि मोर्चाकडे वळूया. या मोर्चाला किती गर्दी जमेल याबाबतचे अंदाज चुकीचे ठरवता यावे इतकी गर्दी CJP ने जमवली याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. ही गर्दी ओसंडून बाहेर पडत होती.
'हे आणून ठेवलंय वापरायचं नाही'
जंतर मंतरचा रस्ता जिथे संसद मार्गाला मिळतो तिथे लावलेल्या बॅरिकेड्स काही ठिकाणी आंदोलकांनी पाडल्या आणि काही बॅरिकेड्स पोलिसांनीच बाजूला करू दिल्या आणि लोक संसद मार्गावर पुढे सरकले.
ही गोष्ट दुपारी 11.30 ची. पण त्यापूर्वीच साधारण 10 वाजेच्या सुमारास आंदोलकांवर लाठीमार झालेला लाईव्ह टीव्हीवर पाहायला मिळाला.
संसद मार्गावर मी दंगल विरोधी पथकाचा ट्रक पाहिला आणि एका जवानाला 'हे वापरायचे नाहीयत, फक्त आणून ठेवलेत' असं दुसऱ्याशी बोलतानाही ऐकलं, पण त्यानंतर काही तासांतच अश्रुधुराचा जोरदार वापर केल्याचं दिसलं.
संसदेकडे गेलेल्या आंदोलकांवर आणि त्यानंतर संध्याकाळी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात अश्रुधुराचा मारा केला गेला.
आम्ही संसद परिसरात शूटिंग करत असताना आमच्या ड्रायव्हर संजय यांना इंदूरची काही मुलं भेटली. त्यांच्या हाता-पायांवर लाठीमार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी आपण हिंसाचार किंवा अटकसत्र किंवा लोकांना ताब्यात घेतलं नसल्याचं X वर पोस्ट करत म्हटलं.
हा मोर्चा संसदेकडे जाणार होता. मी संसद मार्गाच्या एका टोकाला होतो जिथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता, तेव्हाच दुसऱ्या टोकाला माझी सहकारी सुमेधा हिच्यासमोर अश्रुधुराचा मारा होत होता. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या लाठ्या खाऊन आले होते, काहींना धुरामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता.
हा मार फक्त आंदोलकांनाच मिळाला का? काही पत्रकारांनाही यात मारहाण झाली. त्यातलाच एक ऋषिकेश मोरे या आंदोलनात शूटिंग आणि एडिटिंगचं काम करत होता. तो सांगतो, 'मी फोटोग्राफी करत होतो, पोलिसांना मी पत्रकार असल्याचं सांगूनही त्यांनी मला शिवीगाळ केली आणि पोटात आणि पाठीवर लाठ्या मारल्या.'
CJPच्या पहिल्या आंदोलनातही कंटेंट क्रिएटर्सची संख्या भरपूर होती. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. पण पत्रकार काय आणि क्रिएटर्स काय, रेकॉर्ड केलेली कोणतीही गोष्ट; फोटो – व्हीडिओ पाठवण्यासाठी आम्हाला किमान दोन – सव्वा दोन किलोमीटर दूर जावं लागत होतं.
माध्यमांबाबत या आंदोलनात पहिल्या दिवशीपासूनच अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया येताना दिसल्या. मुख्य प्रवाहातल्या अनेक प्रमुख पत्रकारांना खुद्द CJP तसंच त्यांच्या समर्थकांनीही पक्षपाती म्हणत थेट लक्ष्य केलंय.
काही माध्यमं CJP चा मुद्दा भरकटवतायत असा आरोप करत अनेकदा त्यांच्या पत्रकारांना घेराव करणे, त्यांच्याविरोधात घोषणा देणे अशा गोष्टी इथे वारंवार होताना दिसल्या आहेत. आजही अशा तुरळक घटना पाहायला मिळाल्या.
आजच्या आंदोलनात विशेषत्वाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे सत्तेशी असलेले आपले मतभेद अत्यंत तीव्र स्वरात मांडले जात होते.
काही लोक असेही होते ज्यांचा राग परीक्षांच्या एका मुद्द्यावर नव्हता, तो एकूणातच सरकारविरोधात होता आणि इथे तो मोकळेपणे मांडता येईल असं त्यांना वाटून ते इथे आले असावे.
पण केवळ गर्दी जमली म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायचं का? सोनम वांगचूक यांनी अजूनही उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली असली तरी मोर्चाच्या आदल्याच दिवशी त्यांनी उपोषण सोडण्याच्या अटी जाहीर केल्या होत्या, त्यावरही प्रश्न उपस्थित झाले.
पुढे काय होईल?
एका दिवसाच्या मोर्चासाठी लोक जमले, पण सरकारने जर पुढचे काही दिवस यावर काहीच पावलं उचलली नाहीत तर ही गर्दी परत येईल किंवा टिकून राहील का? संसदेच्या या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार अशी चर्चा जोरात आहे.
ते आल्यास राजकीय पक्षांच्या प्राथमिकता बदलतील. त्या परिस्थितीत या आंदोलनाला मिळालेल्या राजकीय पाठिंब्याचं काय होणार? हे प्रश्न कळीचे आणि न टाळता येण्यासारखे आहेत.
'कॉक्रोच' चे प्रवक्ते आणि जे. पी. नड्डा या दोघांनीही दुसऱ्याकडून आपल्याला चर्चेचा प्रस्ताव आधी आल्याचं म्हटलंय. ही लढाई नॅरेटिव्हची असणार आहे.
निर्णय काहीही झाला तरी दोन्ही बाजू तो आपापल्या परीने लोकांपुढे मांडतील. तो निर्णय होणार कधी हा मूळ प्रश्न आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)