You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोल्हापूर फुटबॉलचा विषय 'लय हार्ड'; अनवाणी पाय, चिंध्यांचा बॉल अन् 100 वर्षांचा इतिहास
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
कोल्हापूर आणि रांगडेपणा हे दोन समानार्थी शब्द आहेत, यात शंकाच नाही. कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांमध्येही हा रांगडेपणा अगदी ठासून भरलेला आहे. पण फुटबॉल विश्वचषकाच्या प्रमोशनसाठीच्या एका पोस्टमध्ये हा रांगडेपणा दिसला आणि चर्चेचं एकच वादळ उठलं.
जगभरात कोट्यवधी चाहते असलेल्या फुटबॉलच्या सर्वोच्च स्पर्धेच्या प्रमोशनमध्ये मराठी आणि त्यातही रांगडी कोल्हापुरी मराठी भाषा दिसली अन् राकट, कणखर आणि दगडांच्या या देशामध्ये काय तो उत्साह संचारला.
कोल्हापूर आणि फुटबॉल हे अनेक दशकांचं किंबहुना शतकभराचं नातं त्यामुळं अवघ्या जगाला उमगलं आणि इथल्या तांबड्या रश्शाची नव्हे तर तांबड्या मातीतल्या जिगरबाज खेळांची त्या जगाला ओळख झाली.
140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात क्रीडा चाहते हे क्रिकेटच्या आकंठ प्रेमात बुडालेले आपण कायम पाहतो. पण याच देशाच्या नकाशावर असलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम कोपऱ्यातल्या या जिल्ह्याचं फुटबॉल प्रेम मात्र आजही अनेकाच्या नजरेपासून दूर आहे.
फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं रंगलेल्या फुटबॉलच्या जत्रेतल्या अंतिम सामन्याच्या सोहळ्याकडं जगाचं लक्ष असेल. चाहत्यांसाठी हा विश्वचषकाचा अंतिम सामना असला तरी कोल्हापुरकरांसाठी ती फुटबॉलची जत्राच असते. त्याचं कारण म्हणजे कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम.
पण कोल्हापूरकरांच्या या फुटबॉल प्रेमाचा इतिहास तसाच रांगडा आहे. हाच रांगडा इतिहास आणि फुटबॉलमध्ये एकानं दुसऱ्याकडे चेंडू पास करावा तसं वाढत गेलेलं करवीर वासियांचं फुटबॉल प्रेम याचा आढाला घेणारा हा खास लेख.
कोल्हापूर अन् फुटबॉलचं नातं
फुटबॉल हा कोल्हापूरकरांसाठी फक्त एक खेळ नाही तर ती भावना आहे. अगदी प्रत्येकाच्या मनामनात भिनलेली अशी भावना. त्यामुळं इथं पोरं चालायला शिकण्याऐवजी, फुटबॉलला लाथ मारायला शिकतात असं म्हटलं जातं.
बरं असं का म्हटलं जातं याचं उत्तर जर हवं असेल तर एकदा कोल्हापुरातील फुटबॉलच्या हंगामामध्ये होणाऱ्या सामन्यांना हजेरी लावायलाच हवी.
पाहणाऱ्यांसाठी 90 मिनिटांचा असलेला हा खेळ म्हणजे कोल्हापूरकरांसाठी मात्र त्यांच्या क्लबची परंपरा, तालमींची प्रतिष्ठा, संघांचा अभिमान असतो.
या खेळाचा फिव्हर घराघरांत असा काही पसरलेला पाहायला मिळतो की, चहाच्या कपापासून ते आईने नेसायच्या साडीचा रंगही आपल्या आवडत्या संघाच्या जर्सीच्या रंगासारखा असेल, याची काळजी घेतली जाते.
शहराच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेला हा खेळ पैलवानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीचाही मोलाचा ठेवा ठरलेला आहे.
अगदी शाहू महाराजांपासून सुरू झालेलं हे नातं आता एवढं दृढ झालं आहे की, संपूर्ण जगाला नाईलाजानं त्याची दखल घ्यावी लागली अन् सगळ्यांनाच या नात्याची ओढही लागली.
पण या नात्याची सुरुवात कशी झाली, त्याचा इतिहासही तेवढाच रंजक आहे बरं का.
कशी झाली सुरुवात?
कोल्हापुरातील फुटबॉलचा इतिहास चाळत मागं जात राहिलं तर जवळपास शतकभराचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी याबाबत वेगवेगळ्या नोंदी असल्या तरी फुटबॉलच्या इतिहासाचा कालखंड मात्र 15-20 वर्षांच्या फरकानं आसपासचाच आहे.
या इतिहासाबाबत काही ठिकाणी नोंदी आढळतात तर काही संशोधक, अभ्यासक आणि क्रीडाप्रेमींनीही शोध घेऊन त्याची माहिती मिळवलेली आहे.
या इतिहासाचा सर्वात मागे जाणारा उल्लेख 1914 पर्यंत मागे गेलेला पाहायला मिळतो. कोल्हापूर युनायटेड फुटबॉल असोसिएशन (KUFA) या संस्थेनं 2014 मध्ये कोल्हापुरातील फुटबॉलच्या 100 वर्षांच्या निमित्ताने एका सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
या संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापुरात फुटबॉलच्या क्षेत्राच भरीव काम करणारे अमरदीप कुंडले यांनी याबद्दल माहिती दिली होती.
त्यानुसार, राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे पुत्र युवराज शिवाजी हे इंग्लंडला असताना त्यांची सर्वप्रथम या खेळाशी ओळख झाली. त्यांना तो प्रचंड आवडला. युवराज शिवाजी त्याठिकाणी फुटबॉल शिकलेही. त्यांनीच कोल्हापुरात परतल्यानंतर याठिकाणी फुटबॉलची पाळंमुळं रोवली आणि अशाप्रकारे हा खेळ या तांबड्या मातीत रुजला.
युवराज शिवाजी यांना क्रीडा क्षेत्रात प्रचंड रस होता. त्यांनी आणि राजाराम महाराजांनी कोल्हापूरकरांना हा नवीन खेळ समजण्यासाठी प्रयत्न केल्याचं इतिहास अभ्यासकांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं.
त्यानंतर 1920 च्या सुमारास कोल्हापूरमध्ये जमादार क्लब पहिल्या व्यावसायिक फुटबॉल क्लबची स्थापना झाली होती. त्यांनंतर उरुग्वेमध्ये पहिला फिफा विश्वचषक झाला त्याच्या सुमारे दशकभरापूर्वी कोल्हापुरात या खेळाची अशी मुहूर्तमेढ रोवली गेली होती, असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
काही नोंदींमध्ये या क्लबच्या स्थापनेचं वर्ष 1928 असल्याचं म्हटलं आहे. तेही ग्राह्य धरलं तरी फिफा विश्वचषकाच्या मागे हा इतिहास नक्कीच जातो.
कोल्हापूरचे राजे श्री शहाजी छत्रपती महाराजच म्हणजेच देवासचे विक्रमसिंह महाराज 1929 ते 1932 या काळात कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिकायला होते. तेव्हा ते अत्यंत उत्कृष्ट फुटबॉल खेळायचे. त्यांनी राजाराम कॉलेजला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. ते जेव्हा शहाजी छत्रपती महाराज म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आले तेव्हा त्यांनी फुटबॉल मोठा होण्यासाठी प्रयत्न केले.
शहाजी छत्रपती महाराजांचे योगदान
रमेश पोवार हे कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमी आणि खेळाच्या इतिहासाची माहिती असलेल्या ज्येष्ठांपैकी एक आहेत. त्यांनी सांगितलं की, 1928 मध्ये राजाराम क्लबची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर राजाराम महाराजांनी यात लक्ष घातलं आणि एक प्रकारे या खेळाला राजाश्रय मिळाला.
त्यानंतर कोल्हापूरचे राजे श्री शहाजी छत्रपती महाराज म्हणजेच देवासचे विक्रमसिंह महाराज हे 1929 ते 1932 या काळात कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिकायला होते.
विक्रमसिंह महाराज अत्यंत उत्कृष्ट फुटबॉल खेळायचे. त्यांनी राजाराम कॉलेजकडून खेळताना संघाला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या होता.
नंतरच्या काळात जेव्हा विक्रमसिंह महाराज हे शहाजी छत्रपती महाराज म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आले तेव्हा त्यांनी फुटबॉल या खेळाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याला लोकप्रियता मिळावील यासाठी आणखी प्रयत्न केले.
कोल्हापूरच्या विविध पेठांमध्ये असलेल्या संघांमधून दर्जेदार खेळाडू निवडून त्यांनी त्यावेळी जय भवानी फुटबॉल संघाची स्थापना केली होती.
या खेळाची कोल्हापुरातली लोकप्रियता अशी काही वाढत गेली की, एकापाठोपाठ अनेक संघ, क्लब तयार होऊ लागले. सुमारे दशकभरात झालेल्या या वाढीमुळं खेळाचं व्यवस्थापन होणं अत्यंत गरजेचं होतं.
त्यामुळं 1940 साली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. राजाराम महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांनी स्वतः या संघटनेच्या कामात लक्ष घातलं होतं. त्यानंतर पुढच्या काळात इथं फुटबॉल असा काही लोकप्रिय झाला की आज कोल्हापूरला एक वेगळी ओळख या निमित्ताने मिळाली आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेनंतर या खेळाला कोल्हापुरात संघटित स्वरुप येऊ लागलं. त्यामुळं जागतिक फुटबॉलची रचना तयार होण्यापूर्वी कोल्हापूर आणि परिसरात वेगवेगळ्या पेठांमध्ये त्यांचे फुटबॉल संघ तयार करण्याचे प्रयत्न संबंधित भागातील क्रीडा चाहत्यांनी केले. कुस्तीच्या अनेक तालमींनीही त्यांचे फुटबॉल संघ तयार करायला सुरुवात केली.
त्यामुळं ऐतिहासिक जमादार क्लबशिवाय शिवाजी तरुण मंडळ, जय भवानी फुटबॉल संघ, बालगोपाळ तालिम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, बाराईमाम, बागल चौक , पाटाकडील, दिलबहार, फुलेवाडी अशा अनेक क्लबची स्थापना झाली. त्यांनी पुढं कोल्हापुरात प्रचंड लोकप्रियताही मिळवली.
चिंध्यांचे फुटबॉल अन् अनवानी पाय
कोल्हापुरात शतकभरापूर्वी फुटबॉलची पाळंमुळं तर रुजली पण या खेळाबाबत फारशी माहिती नव्हती आणि शिवाय सोयीसुविधांचाही तसा अभावच असल्याची परिस्थिती होती.
सचिन सूर्यवंशी यांनी कोल्हापूरच्या समृद्ध फुटबॉलचा वारसा सांगणारा एक माहितीपट काही वर्षांपूर्वी तयार केला होता. त्यामध्ये काही ज्येष्ठ माजी फुटबॉलपटूंनी त्याकाळी आजसारख्या सुविधा नसतानाही केवळ जिद्दीनं ही फुटबॉल संस्कृती कशी वाढवली हे सांगितलं आहे.
गजानन इंगवले हे अशाच ज्येष्ठ फुटबॉलपटूंपैकी एक. त्यांनी यात सांगितल्यानुसार, " सुरुवातीला हा खेळ याठिकाणी अगदी प्राथमिक अवस्थेत होता. खेळ कसा खेळायचा, मैदानाची लांबी, कुठल्या प्रकारच्या मैदानावर खेळायचा, टर्फ की गवत असे काहीही बारकावे माहिती नव्हते. एवढंच काय पण सुरुवातीच्या काळात कापडाच्या चिंध्या एकमेकांवर गुंडाळून त्यापासून फुटबॉल तयार करून हा खेळ खेळला जायचा."
हळू हळू याठिकाणी देणाऱ्या विदेशी प्रवाशांना विचारून आणि इतर मार्गांनी माहिती गोळा करून मैदानाचा आकार, चेंडू, गोल पोस्टमधलं अंतर, उंची हे समजत गेलं आणि तसा इथं विकास होत गेला, असंही ते सांगतात.
खेळणारे हौशी लोक तेव्हा चार आणे-आठ आणे अशी वर्गणी गोळा करून फुटबॉल विकत आणायचे. पण तेव्हा फुटबॉलचा दर्जा तसा फार चांगला नसायचा. त्यामुळं खेळून-खेळून 10-15 दिवसांत त्याची झिज व्हायची.
"हा खेळ बूट घालून खेळला जातो हे युरोपातील लोकांना माहिती होतं, पण इथं माहिती नव्हतं. नंतरच्या काळात त्यांना हे समजलं आणि इतरांचं पाहून हळू हळू इथंही खेळाडूंच्या पायात बूट आले," असं इंगवले यांनी म्हटलंय.
आणखी एक ज्येष्ठ फुटबॉलपटू लक्ष्मण पिसे यात सांगतात की, "आम्ही सांगली मिरजला नेहमी खेळायला जायचो. तेव्हा जिंकलो की तिथं राहावं लागायचं. पण आर्थिक परिस्थितीचा विचार करून खर्च परवडत नव्हता. त्यामुळं कोल्हापुरातून खेळाडूंच्या घराघरातून भाकरी, जेवण गोळा करून एकाला आणायला सांगायचं, तो दुसऱ्या दिवशी सकाळी निघुन दुपारी यायचा आणि ते खाऊन आम्ही पुढे खेळत राहायचो."
ज्येष्ठ फुटबॉलपटूंच्या मते, तेव्हा देशात ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यांचे अधिकारी क्रिकेट खेळत असायचे. त्यामुळं तेव्हा क्रिकेट हा प्रतिष्ठितांचा खेळ समजला जायचा. पण फुटबॉलचं मात्र तसं नव्हतं, चेंडू मिळाला की त्याला लाथाडायला सुरुवात करायची, असा हा गोरगरिबांचा खेळ समजला जायचा.
जुन्या काळी फुटबॉलमध्ये बक्षीसंही अनोखी असायची असं अभिजीत वणीरे सांगतात. 1970 पर्यंत विजेत्यांना फक्त चषक मिळायचा. पण काळ बदलत गेला तेव्हा मध्यंतरात खेळाडुंना लिंबू मिळायला लागलं असं ते सांगतात.
1980 दरम्यान कोल्हापुरात 8-10 चांगले संघ तयार झाले. त्यांच्यात चुरशीनं सामने व्हायचे. त्यामुळं प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला. त्यातून पहिला गोल मारणाऱ्याला एक कोंबडी, गोल फेडणाऱ्याला 20 अंडी, सामना जिंकणाऱ्याला बकरा, उत्कृष्ट खेळाडूला एक मुंडी आणि चार पाय अशी बक्षीस असायची. आता मात्र मोठी बक्षीसं मिळतात, असं ते म्हणाले.
पोलंडच्या निर्वासितांमुळे फुटबॉलला हातभार
कोल्हापूर आणि पोलंड यांच्यातील नातं हे अवघ्या जगाला माहिती आहे. पण या नात्यामुळं कोल्हापुरातील फुटबॉललाही हातभार लागला असल्याचं अभ्यासक अभिजीत वणीरे यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना सांगितलं.
"दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा सोव्हिएत युनियनच्या विरोधातील पोलंडच्या युद्धकैद्यांना कोल्हापूरच्या वळिवडे या गावात आश्रय दिला होता. याठिकाणी युद्धकैद्यांसाठी छावण्या बांधून त्यांची सोय करण्यात आली होती.
या युद्धकैद्यांमध्ये फुटबॉल खेळणारे काही जण होते. त्यांच्यासोबत कोणीतरी खेळावं अशी त्यांची इच्छा होती. कोल्हापुरात हा खेळ खेळला जात असल्याचं त्यांना समजलं तर त्यांनी कोल्हापूरच्या महाराजांकडे कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंनी आमच्याबरोबर खेळावं, अशी विनंती केली.
त्यानंतर कोल्हापूरचे खेळाडू आणि पोलंडचे युद्धकैदी यांच्यात अनेकदा सामने होऊ लागले. याचा कोल्हापूर क्रिकेटला फायदा झाला. कारण त्यातून नियमानुसार हा खेळ कसा खेळायचा, त्याचे बारकावे असं बरंच काही त्याकाळी कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंना शिकायला मिळालं," असं वणीरे सांगतात.
ज्येष्ठ फुटबॉलपटू अब्बास मुकादम यांनी माहितीपटात त्याकाळातील आठवणी सांगताना म्हणतात की, "पोलंडच्या संघातील लोक त्यावेळी ते बुटाने खेळायचे. पण आम्ही मात्र अनवानी पायाने खेळायचो. आम्ही तेव्हा बुटाला घाबरायचो. पण बूटही न वापरता आमच्या संघांने त्यांचा पराभव केला आहे."
ब्रिटिशांच्या पलटनबरोबर ऐतिहासिक सामना
अशाच आणखी एका ऐतिहासिक सामन्याची आठवणही काही ज्येष्ठ क्रीडापटू अनेकदा सांगतात. हा सामना होता कोल्हापुरातील प्रतिष्ठित प्रॅक्टिस क्लब आणि ब्रिटिशांची पलटन यांच्यात झाला होता.
1936 सालच्या अखेरीस ब्रिटिशांची 10 RTC हा पलटन कोल्हापुरात आली होती. ही पलटन कोल्हापुरात दोन-तीन दिवस मुक्कामी राहणार होती. त्यावेळी कोल्हापुरात प्रॅक्टिस क्लबची स्थापना झालेली होती.
तेव्हा प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडुंनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना आमच्याबरोबर सामना खेळणार का? असं विचारलं. तेव्हा लोकांनी ब्रिटिशांबरोबरच्या या सामन्याचा प्रचंड गर्दी केली. ब्रिटिश हा सामना सहज जिंकतील वाट असताना प्रत्यक्षात मात्र हा सामना 1-1 असा अटीतटीचा होत सामना बरोबरीत सुटला होता.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीत या सामन्याचा उल्लेख आहे. त्यात तर प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी हा सामना अनवानी पायांनी खेळला होता, असं म्हटलं आहे.
या सामन्यात प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी स्थानिक टेलरकडून शिवलेले काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. हाच रंग आजतागायत या फुटबॉल क्लबच्या जर्सीसाठी वापरला जातो हे विशेष.
नावं आणि रंगाशी जोडलेल्या भावना
कोल्हापूरत्या फुटबॉल क्लबची नावं हाही चर्चेचा असाच विषय राहिला आहे. अगदी सुरुवातीच्या काळातील प्रॅक्टिस क्लबपासून या खास नावांच्या परंपरेला सुरुवात झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सुरुवातीच्या बालगोपाळ, बाराईमाम, बागल चौक , पाटाकडील, दिलबहार, फुलेवाडी, खंडोबा अशा नावांची परंपरा पुढंही कायम राहिली. तालिमी, पेठांची नावं , वेगवेगळ्या संघटना, मंडळं यांनी त्यांच्या फुटबॉस संघांना ही नावं दिली आणि ते आजतागायत सुरू आहे.
हे झालं नावांचं. पण जसा मेस्सी आणि रोनाल्डोच्या जर्सीचा थाट असतो तसाच काहीसा थाट कोल्हापुरातल्या या कल्बच्या जर्सींचा असतो. अनेक दशकं जुन्या असलेल्या अनेक क्लबनं तेव्हापासून आजतागायत त्यांच्या जर्सीचे रंग बदललेले नाहीत.
बरं जर्सीच्या रंगाचा एवढा प्रभाव त्यांच्यावर आहे की, अगदी घरापर्यंत तो पाहायला मिळतो. एखाद्या क्लबचा फॅन असेल तर त्याच्या गाडीला तसाच रंग असतो. कपड्यांचं तर झालंच. पण अनेकदा घरातील वस्तू,अगदी दिवाळीचे आकाशकंदीलही तशा रंगसंगतीचे असतात असं कोल्हापुरातील लोक अगदी अभिमानानं सांगतात.
फुटबॉलसाठी असलेलं प्रेम नव्हे तर वेडच या माध्यमातून पाहायला मिळतं. एखाद्या गल्लीत गेल्यावर त्या गल्लीतील लोक कोणत्या क्लबचे फॅन आहेत हे ओळखायला वेळही लागत नाही.
पण एवढं वेड असूनही कोल्हापूरचा फुटबॉल जिल्ह्यापुरता किंवा फारतर महाराष्ट्रापुरता का मर्यादीत राहिला? असा प्रश्न उपस्थित होतो.
जागतिक पातळीपर्यंत पोहोचण्यात अडचण काय?
संशोधक आणि माजी फुटबॉलपटू अभिजीत वणीरे यांनी कोल्हापूरचा फुटबॉल या मर्यादीत वर्तुळातच का अडकून राहिला याचं विश्लेषण केलं आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंना पेठा आणि क्लबमधील आपसांतील स्पर्धा किंवा इर्ष्या सोडून बाहेर जाण्याचा मोठा विचारच केला नाही, हे त्यामागचं मुख्य कारण असल्याचं ते सांगतात.
त्याशिवाय मैदानं, सोयीसुविधा अशाही अडचणी असल्याचं ते सांगतात. हंगाम सोडला तर वर्षभर खेळण्यासाठीच्या मैदानाची कमतरता भासत असल्याचं ते सांगतात.
त्यांच्या मते, कोल्हापुरात तर मैदानं आहेत पण त्यांची व्यवस्था नसल्यानं त्याचा फटका बसत असल्याचंही ते म्हणाले. अनेक मैदानं ओसाड आहेत. ती उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि मैदानांचीही व्यवस्था राहील, असं ते सांगतात.
कोचिंगसाठीही काही आंतरराष्ट्रीय पातळीवरून मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर इतर ठिकाणी जर खेळाडू खेळात उतरले तर त्यांचं त्यात करिअर घडण्याची शक्यता अधिक असतो. तसं आपल्याकडं नाही आणि त्याचा फटका बसतो.
सर्वसामान्य घरातली मुलं असल्यानं त्यांना आर्थिक अडचणी येतात, डाएटसारख्या अडचणी येतात त्याचाही सारासार विचार केला तर फटका बसत असल्याचं पाहायला मिळतं.
सरावाबाबतीत मुलांच्या मानसिकतेतही बदल होणं गरजेचं आहे, असंही ते सांगतात. म्हणजे सकाळी लवकर प्रॅक्टिस करायलाही काही जण तयार नसतात, असं ते सांगतात. त्यामुळं तरुणांच्या इच्छाशक्तीवरही बरंच काही अवलंबून आहे.
मैदानावर पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचं म्हटलं तर त्यातही आजच्या काळात दर्दी कमी आणि हुल्लडबाज जास्त असल्याचं चित्र दिसतं, अशी खंतही ते व्यक्त करतात.
पण असं असलं तरी आता नवीन येणाऱ्या मुलांची मानसिकता बदलली असल्याचं ते सांगतात. मुलं बाहेर जायला अगदी परदेशात जायलाही तयार आहेत. शाळेच्या विद्यापीठाच्या टीम चांगलं खेळत आहे, त्यामुळं भविष्यात परिस्थिती सुधारण्याची आशा वणीरे व्यक्त करतात.
आता लवकरात लवकर भारताचा संघ फुटबॉल विश्वचषकात खेळावा यासाठी सरकार, संघटना, खेळाडू, पालक आणि प्रेक्षक असं सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे.
तसं झालं तरच शंभर वर्षांपूर्वी कोल्हापुरात चिंध्यांच्या बॉलपासून सुरू झालेला हा प्रवास जगाच्या नकाशावर पोहोचू शकेल. पण त्यासाठी कोल्हापूरचाच नव्हे तर भारताचा विषय लय हार्ड आहे असं म्हण्यासाठी संपूर्ण जगाला भाग पाडावं लागेल आणि त्यासाठी तशी कामगिरी उंचवावी लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)