फलकांऐवजी मीम्स, घोषणांऐवजी रील्स... तरुणांच्या आंदोलनात काय बदललं?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मागील काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.

नीट पेपर परीक्षेतील अनियमितता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या यासाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकर्त्यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, या आंदोलनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांच्या हातात असलेली विविध घोषणा कविता, मीम्सची पोस्टर्स

अत्यंत मोजक्या आणि रोखठोक शब्दांत तरुणाईने मांडलेली त्यांची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. जंतरमंतरवरील भिंतीही आता बोलू लागल्या आहेत. या आंदोलनात रंगवलेल्या भिंती, तरुणाई आणि मीम्सचं वादळ पाहा या काही फोटोंमधून..

सध्या जंतर-मंतरवर समर्थकांची गर्दी आहे. पाऊस आणि उकाड्याला न जुमानता तरुणाई आपल्या मागण्यांसह जंतर-मंतरवर ठामपणे टिकून आहेत.

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आणि नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉक्रोच जनता पार्टी'चे समर्थक मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर दाखल होत आहे. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय.

'वन पीस' या लोकप्रिय जपानी अॅनिमे आणि मांगा मालिकेतील स्ट्रॉ हॅट पायरेट्स हा झेंडा सध्या प्रतिकार, स्वातंत्र्य आणि दडपशाहीविरोधातील लढ्याचे प्रतीक म्हणून वापरला जातोय. या ध्वजात कवटी आणि क्रॉसबोन आहेत.

तरुण पिढी खासकरून जेन-झी वर्गाकडून हा झेंडा अन्याय, हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनांमध्ये स्वातंत्र्याचे व विद्रोहाचे प्रतीक म्हणून वापरला जातोय.

इंडोनेशिया, फिलिपाइन्स, नेपाळ आणि इतर काही देशांतील आंदोलनामध्ये हा झेंडा दिसून आला होता.

भारतात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सीजेपीच्या झेंड्यासोबत वन पीसचा झेंडाही आणण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. जंतर-मंतरवरही काही समर्थकांच्या हातात हा दिसून आला.

जंतर-मंतरवर सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून (सीजेपी) अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे मात्र सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. मात्र, विरोध दर्शवताना तरुणाईने संतापासह विनोदाची चांगली सांगड घातली आहे.

आंदोलनकर्ते, विद्यार्थ्यांच्या हातात विविध पोस्टर्स दिसत असून त्यावरील मजकूर, मीम लक्ष वेधून घेत आहे.

आंदोलनांमध्ये विनोद हा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. तो लोकांना एकत्र आणतो, तणाव हलका करतो आणि कठीण प्रसंगीही धैर्याने उभं राहण्याची ताकद देतो. तरुणाईच्या या आंदोलनात काही मजेशीर मीम्सही आहेत.

अन् भिंती बोलू लागल्या..

आंदोलनांमध्ये भीती असते, पण त्याचबरोबर बदलाची आशाही असते. जंतर-मंतर परिसरातील भिंतींवरही तरुणाईने आपल्या मनातील उद्रेक, संताप आणि भावना नोंदवल्या आहेत. जंतर-मंतरवरील आजचं वातावरण कसं आहे, पुढील चित्रांमधून पाहा

जंतर-मंतर परिसरातील भिंतींवरही विविध घोषणा रंगवण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी राजीनाम्याची मागणीही भिंतींवर लिहिलेली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.