विजेता दहिया कोण आहेत? सीजेपीने त्यांना प्रवक्ते पदावरुन का हटवलं?

सीजेपीने विजेता दहिया यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून मुक्त केलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सीजेपीने विजेता दहिया यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून मुक्त केलं आहे.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

'संसद चलो' मोर्चा काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (21 जुलै) कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) विजेता दहिया यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हटवलं. याबाबतची माहिती पक्षाने एक्सवर एक पोस्ट करून दिली.

सोमवारी (20 जुलै) संसद चलो आंदोलनादरम्यान पोलिसांनी सीजेपी आंदोलकांविरोधात लाठीचार्ज केला होता.

याच दरम्यान विजेता दहिया यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बीबीसीने या व्हीडिओची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.

जून महिन्यात सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची घोषणा केली होती.

शोध पत्रकार सौरव दास यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय? विजेता दहिया यांनी काय म्हटलं?

ज्या व्हीडिओमुळे हा वाद सुरू झाला, त्या व्हीडिओची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.

या व्हीडिओमध्ये विजेता दहिया सोमवारी सीजेपीच्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान दिल्लीतील एका प्रसिद्ध फास्ट फूड दुकानात दिसल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित केले. आंदोलकांवर पोलीस लाठीचार्ज करत असताना विजेता दहिया आंदोलनस्थळी का नव्हते, असा सवाल त्यांनी केला.

टीकेनंतर विजेता दहिया यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ते 'संसद चलो' मोर्चात सहभागी झाले होते. पण, मोर्चा संपल्याचं वाटल्यामुळे ते तेथून निघून गेले.

विजेता दहिया यांनी 'त्या' व्हीडिओवर भाष्य केलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विजेता दहिया यांनी 'त्या' व्हीडिओवर भाष्य केलं आहे.

दहिया व्हीडिओत म्हणाले, "मी बर्गर का खाल्ला? हाच सध्या सर्वात मोठा मुद्दा झाला आहे. पण कोणीही बर्गर का खातं? कारण त्याला भूक लागलेली असते. मलाही खूप भूक लागली होती. त्यामुळे मी बर्गर खाल्ला. चांगलं खाल्लं की मूडही चांगला होतो."

दहिया यांनी असंही म्हटलं की, टीका करणारे लोक आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करत आहेत.

ते म्हणाले, "लोक हे पाहत नाहीत की, मी गेल्या दोन रात्री झोपलेलो नाही. आंदोलनात सहभागी झालेले इतर लोकही दोन रात्री झोपलेले नाहीत."

दहिया यांनी असंही सांगितले की, 'मार्च'मधून निघाल्यावर ते आधी आंघोळीसाठी घरी गेले आणि त्यानंतर जेवणासाठी थांबले.

सीजेपीने प्रवक्ते पदावरून हटवलं

याचदरम्यान सीजेपीने विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून हटवलं होतं.

सीजेपीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "आमचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्या अतिशय असंवेदनशील वर्तणुकीचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततेने आंदोलन करणारे लोक आणि आमचे कार्यकर्ते पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात असतानाच त्यांनी हा व्हीडिओ प्रसिद्ध केला."

सीजेपीने मागील महिन्यात विजेता दहिया, सौरव दास आणि आशुतोष रांका (डावीकडून उजवीकडे) यांची प्रवक्तेपदी नेमणूक केली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सीजेपीने मागील महिन्यात विजेता दहिया, सौरव दास आणि आशुतोष रांका (डावीकडून उजवीकडे) यांची प्रवक्तेपदी नेमणूक केली होती.

सीजेपीने म्हटलं, "असं वर्तन स्वीकार्य नाही. यात समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो आणि हे आमच्या आंदोलनाच्या मूल्यं व तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे."

सीजेपीने सांगितलं की, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदासह पक्षाच्या इतर सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात आलं आहे.

कोण आहेत विजेता दहिया?

सीजेपीने मागील महिन्यात विजेता दहिया यांना प्रवक्ते पद दिल्याचे जाहीर केले होते. ही नियुक्ती जाहीर करताना त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "राजकीय संशोधन आणि धोरणात्मक विश्लेषणाचा चांगला अनुभव असलेले विजेता दहिया प्रवक्तेपदाची भूमिका स्वीकारत आहेत."

"ते लेखक, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्माते असून अनेक यूट्यूब क्रिएटर्ससाठी संशोधन आणि कंटेंट तयार करण्याचे कामही त्यांनी केले आहे."

"त्यांनी 'पॉवर ऑफ युनिव्हर्स' आणि 'टू हेल विथ दॅट जॉब' ही दोन बेस्ट-सेलिंग पुस्तके लिहिली आहेत. तसेच, त्यांनी हरियाणवी चित्रपट 'दरारें' आणि 'ओपरी पराई'चे लेखन आणि त्यांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांचे शिक्षण प्रतिष्ठित दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून (डीटीयू) झाले आहे."

विजेता दहिया

फोटो स्रोत, @VijetaDahiya/X

विजेता दहिया यांच्या प्रोफाइलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की, "राजकीय लोकशाही टिकून राहण्यासाठी समाजातही खरी लोकशाही म्हणजेच सामाजिक लोकशाही असणं गरजेचं आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे असे जीवन ज्यात स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांचा आदर केला जातो."

ध्रुव राठीसोबत काम करण्याबाबत विजेता दहिया काय म्हणाले होते?

विजेता दहिया यांनी एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना त्यांच्या करिअर आणि शिक्षणाबद्दल माहिती दिली होती.

करिअरबद्दल बोलताना विजेता दहिया म्हणाले, "कॉलेजमध्ये असतानाच विप्रो आणि रॅनबॅक्सीमध्ये माझी निवड झाली होती. मी रॅनबॅक्सीमध्ये नोकरी सुरू केली. तिथे काम करून काही पैसे जमा केले आणि नंतर मुंबईला गेलो. त्यानंतर वेगवेगळी कामं करायला सुरुवात केली."

विजेता दहिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या करिअरबद्दल सांगितलं, "लहानपणापासून मी साहित्य वाचत होतो. टागोर, प्रेमचंद आणि चार्ल्स डिकन्स यांसारख्या लेखकांना वाचलं."

"त्यामुळे जे काही करायचं ते चांगलं करायचं, असं मनातच होतं. मी फिल्म वर्कशॉप केले, त्यामुळे चित्रपट बनवण्याची कल्पना आली. त्यानंतर मी 'दरारें' या चित्रपटाची पटकथा लिहिली."

विजेता दहिया

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"नंतर लक्षात आलं की चित्रपटासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे आणि घरच्यांकडून पैसे घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी एसएससी (सीजीएल) परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झालो. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात तीन-साडेतीन वर्षे नोकरी केली. मग नोकरी सोडून 'दरारें' हा चित्रपट बनवला."

या मुलाखतीत विजेता दहिया यांनी सांगितलं की, ध्रुव राठी यानेच त्यांना 'कॉक्रोच जनता पार्टी'मध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता.

ध्रुव राठीसाठी लेखन करण्याबाबत दहिया यांनी सांगितलं की, "मला समजलं की ध्रुवला लेखकाची गरज आहे. मी ई मेल केला आणि त्यानंतर ध्रुवसाठी लिहायला सुरुवात केली. याच काळात 'दरारें' प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'ओपरी पराई' बनवला, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला."

या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "एखाद्याने आयुष्यात 6-7 चांगले चित्रपट बनवले तरी ते मोठं काम आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा. माझं मत आहे की प्रत्येक गोष्ट केवळ पैशांसाठी करू नये. पैशांसाठी तर मी अजून इतर 70 कामं करू शकतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)