You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनम वांगचूक आणि 'थ्री इडियट्स'चा संबंध नेमका काय? आमिर खान यांचं स्पष्ट उत्तर
- Author, गीता पांडे, निकिता यादव
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
अभिनेता आमिर खान यांनी अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणावरील आपली भूमिका मांडली आहे.
सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण करत आहेत.
यापूर्वी अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले आमिर खान आता कुठे आहेत, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत होते. विशेषतः थ्री इडियट्स हा चित्रपट वांगचूक यांच्या कामांपासून प्रेरित असल्याचे मानले जात असल्याने हा प्रश्न विचारला जात होता.
गुरुवारी लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यात आमिर खान यांनी थ्री इडियट्समधील त्यांचे 'रँचो' हे पात्र सोनम वांगचूक यांच्यापासून प्रेरित असल्याचा दावा फेटाळून लावला.
लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान यांच्या लगान या चित्रपटाचेही स्क्रीनिंग करण्यात आले. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्यावर आधारित एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये आमिर यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
आमिर यांनी सांगितले की त्यांना सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची खूप चिंता वाटते आणि त्यांनी लवकरच आपले उपोषण संपवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
यापूर्वी थ्री इडियट्समध्ये चतुर रामलिंगमची भूमिका साकारणारे अभिनेते ओमी वैद्य यांनीही वांगचूक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. वांगचूक यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून त्यांनी लिहिले होते, "मला फुनसुख वांगडूचा मृत्यू व्हावा असे वाटत नाही."
अनेक वर्षांपासून थ्री इडियट्समधील आमिर खान यांचे फुनसुख वांगडू हे पात्र सोनम वांगचूक यांच्याकडून प्रेरणा घेऊन केलं असल्याचे मानले जात होते. मात्र, वांगचूक यांनी नेहमीच स्वतःला या दाव्यापासून दूर ठेवले आहे. गुरुवारी आमिर खान यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
वांगचूक यांनी काय म्हटलं होतं?
हा चित्रपट तयार करताना त्यांच्याशी कधीही सल्लामसलत करण्यात आली नाही, त्यांची संमती घेण्यात आली नाही, असं वांगचूक यांचं म्हणणं होतं नंतर त्यांनी त्यांच्या कामाचा आणि आयुष्याचा कथित वापर केल्याबाबत चित्रपट निर्मात्यांना पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले, तरी त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. "ते माझ्या शाळेत गुपचूप चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी आले होते.", असा दावाही त्यांनी एकदा केला होता.
'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या संभाषणादरम्यानही सोनम वांगचूक यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
ते म्हणाले होते, "जर तुम्ही म्हणाल की हा चित्रपट प्रेरित आहे, तर मी त्याला नकार देणार नाही. अनेक लोक म्हणतात की हा चित्रपट माझ्यावर आधारित आहे, पण मी त्याच्याशी सहमत नाही. हा चित्रपट कदाचित माझ्यापासून प्रेरित किंवा प्रभावित असू शकतो असं म्हणता येईल."
"त्याचबरोबर मला हेही नको आहे की या देशातील लोक एखादी गोष्ट केवळ तिचा संबंध एखाद्या चित्रपटाशी आहे म्हणून स्वीकारतील. त्यामुळे हा चित्रपट माझ्यापासून प्रभावित असला तरी मला त्याचा काही विशेष अभिमान नाही. तसंच जर तो माझ्यापासून प्रेरित नसेल, तर त्याबद्दल मला काही खंतही नाही."
आमिर खान यांनी काय म्हटलं?
लंडनमध्ये आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान यांना सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणाबाबत आणि त्याचा 'थ्री इडियट्स'शी संबंध जोडून प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले, "हा एक गैरसमज आहे. आम्ही 'थ्री इडियट्स' बनवत होतो, तेव्हा मी सोनम यांना ओळखतही नव्हतो. अलीकडेच मी चतुरचा एक व्हीडिओ पाहिला, त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते, पण ते चुकीचं आहे. कदाचित त्यांना तसे वाटत असेल, पण या चित्रपटाचे लेखक राजू आणि अभिजित जोशी आम्ही कोणीच त्यावेळेस सोनम यांना ओळखत नव्हतो."
ते पुढे म्हणाले, "तथापि, सोनम जे काम करत आहेत ते खूप चांगले आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी ते 'थ्री इडियट्स'मधील कोणत्याही पात्राची प्रेरणा असणे आवश्यक नाही. मला फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती."
यानंतर आमिर यांना सोनम वांगचूक यांची खालावत चाललेली प्रकृती आणि त्यांचे बेमुदत उपोषण याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर त्यांनी सांगितले, "आपण सर्वजण त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल खूप चिंतित आहोत. यावर चांगला तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा आहे. आम्हा सर्वांची इच्छा आहे की त्यांनी त्यांचे उपोषण संपवावे."
'जोश टॉक्स'च्या एका सत्रात सोनम वांगचूक यांनी त्यांना 'थ्री इडियट्स'बद्दल पहिल्यांदा कसे कळले, हे सांगितले होते.
ते म्हणाले होते, "मी त्यामुळे त्रस्त आहे कारण लोक मला सतत विचारत राहतात, 'थ्री इडियट्समध्ये दाखवलेली शाळा तुमचीच आहे का? तुम्ही फुनसुख वांगडू आहात का?' मला हे स्पष्ट करायचे आहे की नाही, मी फुनसुख वांगडू नाही. मी सोनम वांगचूक आहे. मी चित्रपटांमध्ये काम करत नाही, मी खऱ्याखुऱ्या जगात काम करतो. ज्या नवकल्पना भारतातून जगभर पोहोचतील आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, अशा कल्पनांवर मी काम करतो"
कशी आहेत वांगचूक यांची तब्येत?
दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आरोग्याबाबत दररोज माहिती दिली जाते.
डॉ. सतीश लांबा यांनी 19 व्या दिवसाचं आरोग्यविषयक बुलेटिन जारी केलं होतं.
डॉ. लांबा म्हणाले होते, सोनम वांगचूक यांचे उपोषणाच्या 19 व्या दिवसापर्यंत 9 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी झालं आहे. तरीही, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण (हायड्रेशन पातळी) सध्या सामान्य आहे आणि ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहेत.
आरोग्य बुलेटिननुसार, वांगचूक यांची रक्तातील साखरेची पातळी 80 मिग्रॅ/डेसिलिटर इतकी नोंदवण्यात आली आहे, तर त्यांची नाडीचे ठोके प्रति मिनिट 72 इतके आहेत.
यापूर्वी, बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका व्हीडिओ संदेशात सोनम वांगचूक यांनी सांगितलं होतं की, 18 दिवसांचं उपोषण पूर्ण करूनही त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष सामान्य होते.
एका व्हीडिओ संदेशाद्वारे वांगचूक यांनी 'चलो संसद' मोहिमेअंतर्गत संसद भवनाकडे आयोजित शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे.
परवा (15 जुलै) सोनम वांगचूक यांनी रात्री उशीरा एक व्हीडिओ पोस्ट करत 'माझ्या तब्येतीची काळजी करण्याऐवजी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी 20 जुलै रोजी मोठ्या संख्येनं या,' असं आवाहन केलं होतं.
"हजारो लोकांचे असे मेसेज येत आहेत की, मी हे उपोषण सोडावं. काहीजणांनी न्यायलयालाही अपील केली आहे की, सरकारनं मला जबरदस्ती खायला घालावं. मी काही खाल्लं तरी काय फरक पडणारे? यातून सरकारला हाच मेसेज जाईल, की उत्तरदायित्व काही गरजेचं नाही. असे लोक उपोषणाला बसतात आणि निघून जातात." असं 15 जुलै रोजी ते म्हणाले होते.
"माझी अवस्था इतकीही वाईट नाहीये की, मी दोन-चार दिवसांत मरेन. अनेक टेस्ट्स केल्या जात आहेत. रिझल्ट्स बरेचसे नॉर्मल आहेत. आज इसीजी झाला. नॉर्मल आहे. त्यामुळे मी अनेक दिवस चालू शकतो अजून. कमकुवतपणा नक्कीच आहे, पण माझं मन अद्यापही शाबूत आहे", असंही त्यांनी सांगितलं.
कोर्टानं जनहित याचिकेवर सरकारकडून मागितलं उत्तर
दिल्ली हायकोर्टाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा 'जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल' घेण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचूक दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत.
कायदेशीर बातम्या आणि विश्लेषणाचे वार्तांकन करणाऱ्या 'बार अँड बेंच' (Bar & Bench) या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे.
सैनी म्हणाले की, "एक सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ता आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत, सरकारच्या अत्यंत अलोकप्रिय आणि सर्वत्र टीका होत असलेला निर्णयांच्या विरोधात आंदोलन करत आहे. एका अर्थाने, तो संपूर्ण राष्ट्रासमोर स्वतःचे प्राण पणाला लावत आहे."
न्यायालयानं सांगितलं की , या प्रकरणाचं गांभीर्य आणि तातडीने सुनावणीची आवश्यकता लक्षात घेऊन, या याचिकेवर गुरुवार, 16 जुलै रोजी सुनावणी केली जाईल.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, "केंद्र सरकारच्या वतीने कुणीही उपस्थित नाही. आम्ही या याचिकेवर सुनावणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण उद्यासाठी सूचीबद्ध करू आणि केंद्र सरकारकडून सूचना मागवू."
'मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे'
"मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे."
बीबीसी न्यूजने जेव्हा सोनम वांगचूक यांना सोमवारी (13 जुलै) भेट दिली तेव्हा त्यांनी हे सांगितले. उपोषणाच्या 16 व्या दिवशी त्यांनी बीबीसी न्यूजला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी आंदोलनाबाबतचा निर्धार सांगितला.
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार वांगचूक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालं. त्यांचं ब्लडप्रेशरही (रक्तदाब) 109/70 इतकं आहे.
त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हजारो लोकांनी त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं.
परंतु, 59 वर्षीय वांगचूक हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. "मी सुरू केलेलं काम त्याच्या शेवटापर्यंत नेणार आहे," असं ते म्हणाले होते.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलं आहे. ही संघटना भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, मे महिन्याच्या सुरुवातीला मेडिकल प्रवेश परीक्षेचे (नीट) पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे.
परंतु, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. तसेच सीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना त्यांनी 'देशात गोंधळ माजवणाऱ्या (विघातक) शक्तींची बी-टीम' म्हटलं. देशाच्या प्रगतीवर त्यांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
लडाखचे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक 28 जूनपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तेव्हापासून ते बेमुदत उपोषणावर आहेत.
स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी मानणारे सोनम वांगचूक म्हणतात की, त्यांचा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाच्या विचारांवर विश्वास आहे. उपोषणाच्या माध्यमातून सरकारची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
कोण आहेत सोनम वांगचूक?
'सोनम सर' म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचूक हे लडाखमधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही झालं आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सोनम वांगचूक यांनी लडाखला हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करता यावा, यासाठी अनेक उपाय सुचवले आणि विकसित केले.
सोनम वांगचूक 'आइस स्तूप' या संकल्पनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. हा बौद्ध स्तूपापासून प्रेरित शंकूच्या आकाराचा कृत्रिम बर्फाचा स्तूप आहे. हिवाळ्यात तो पाणी साठवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला गरज असताना तेच पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो.
सोनम वांगचूक यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात 2018 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराचाही समावेश आहे. हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
2009 मध्ये आलेल्या सुपरहिट 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा सोनम वांगचूक हेच होते. 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातही ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचूक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले. सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली.
सोनम वांगचूक निर्णयावर ठाम
दिल्लीत सध्या प्रचंड उकाडा आणि दमट हवामान असूनही, शेकडो लोक दिवस-रात्र जंतर-मंतरवर येऊन सोनम वांगचूक आणि सीजेपीला पाठिंबा देत आहेत.
अभिजीत दीपके यांनी सोमवारी बीबीसीला सांगितलं की, "आज (सोमवारी) त्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे. त्यांची रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी झाले आहेत. जेव्हा जेव्हा ते बसण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना तीव्र चक्कर येते."
ते म्हणाले, "त्यांना वॉशरूमपर्यंत चालत जाणंही कठीण झालं आहे. त्यांना खूप त्रास होत आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना उपोषण सोडण्यास सांगतो, तेव्हा ते मला रागावतात आणि 'माझी काळजी करू नकोस,'" असं म्हणतात.
अभिजीत दीपके यांच्या मते, डॉक्टरांनीही सोनम वांगचूक यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दीपके म्हणाले, त्यांना दररोज हजारो संदेश येत आहेत. त्यात अनेक जण वांगचूक यांना उपोषण सोडण्यासाठी समजावून सांगण्याची विनंती करत आहेत.
"परंतु, सोनम वांगचूक अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत."
दीपके यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी म्हटलं आहे की, जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत सरकारकडून जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत."
वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता
जंतर-मंतरवर उपस्थित असलेले अनेक लोकही आता वांगचूक यांना उपोषण थांबवण्याची विनंती करत आहेत. त्यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून ते चिंतेत आहेत.
हैदराबादमधील 29 वर्षीय अभियंता अनिमेष साहू म्हणाले, "मी त्यांचे व्हीडिओ पाहतच मोठा झालो आहे. त्यांच्याशी माझं भावनिक नातं आहे. त्यांच्या प्रकृतीची खूप चिंता वाटते. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे."
शेतकरी सत्यप्रकाश भारद्वाज यांनी वांगचूक यांना 'हिरा' म्हटलं. ते म्हणाले, "नव्या पिढीसाठी ते स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार आहेत. त्यांनी आता उपोषण थांबवावं, अशी मी विनंती करतो. ते निरोगी राहिले तरच आपल्या मुलांसाठी पुढे लढू शकतील."
शिक्षणतज्ज्ञ प्रा. नंदिता नारायण म्हणाल्या, "सार्वजनिक जीवनात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करावं लागणं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे."
त्यांनीही वांगचूक यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन करताना म्हटलं की, "त्यांच्या जीवाला धोका आहे. ही चळवळही दीर्घकाळ चालणार आहे. आंदोलनही दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जिवंत राहून या संघर्षाचं नेतृत्व करणं खूप आवश्यक आहे."
संसदेवर मोर्चा काढणार
वांगचूक यांनी उपोषण सुरू केल्यापासून विविध राजकीय पक्षांचे खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांची भेट घेण्यासाठी जंतर-मंतरवर येत आहेत.
परंतु, अभिजीत दीपके म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा एकही नेता अद्याप जंतर-मंतरवर आलेला नाही. तसेच सरकारकडूनही चर्चेसाठी कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही.
ते म्हणाले, "सरकार देशातील नागरिकांच्या मागणीकडे इतक्या सहजपणे दुर्लक्ष का करत आहे, हे समजत नाही. आम्ही फक्त जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहोत."
"आम्हाला किंवा सोनम वांगचूक यांना शिक्षणमंत्री करा, अशी आमची मागणी नाही. केवळ उत्तरदायित्व निश्चित केले जावे आणि परीक्षा योग्य प्रकारे घेण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली जावी, एवढीच आमची मागणी आहे."
सरकार चर्चेसाठी पुढे आले नाही, तर आम्हीच सरकारकडे जाऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशनही याच दिवशी सुरू होणार आहे.
दीपके म्हणाले, "आम्ही गेल्या 24 दिवसांपासून येथे बसलो आहोत आणि सोनम सर गेल्या 16 दिवसांपासून उपोषणावर आहेत. तरीही सरकारने ना हस्तक्षेप केला, ना चर्चेला सुरुवात केली. त्यामुळे आता आम्हीच संसदेत जाऊन सरकारसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)