सोनम वांगचूक यांचं वजन 9 किलोने घटलं; डॉक्टर आज काय म्हणाले?

सोनम वांगचूक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गीता पांडे, निकिता यादव
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आरोग्याबाबत दररोज माहिती दिली जाते.

डॉ. सतीश लांबा यांनी 19 व्या दिवसाचं आरोग्यविषयक बुलेटिन जारी केलं आहे.

डॉ. लांबा यांच्या मते, सोनम वांगचूक यांचे उपोषणाच्या 19 व्या दिवसापर्यंत 9 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी झालं आहे. तरीही, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण (हायड्रेशन पातळी) सध्या सामान्य आहे आणि ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहेत.

आरोग्य बुलेटिननुसार, वांगचूक यांची रक्तातील साखरेची पातळी 80 मिग्रॅ/डेसिलिटर इतकी नोंदवण्यात आली आहे, तर त्यांची नाडीचे ठोके प्रति मिनिट 72 इतके आहेत.

यापूर्वी, बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका व्हीडिओ संदेशात सोनम वांगचूक यांनी सांगितलं होतं की, 18 दिवसांचं उपोषण पूर्ण करूनही त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष सामान्य होते.

एका व्हीडिओ संदेशाद्वारे वांगचूक यांनी 'चलो संसद' मोहिमेअंतर्गत संसद भवनाकडे आयोजित शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे.

काल (15 जुलै) सोनम वांगचूक यांनी रात्री उशीरा एक व्हीडिओ पोस्ट करत 'माझ्या तब्येतीची काळजी करण्याऐवजी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी 20 जुलै रोजी मोठ्या संख्येनं या,' असं आवाहन केलं होतं.

"हजारो लोकांचे असे मेसेज येत आहेत की, मी हे उपोषण सोडावं. काहीजणांनी न्यायलयालाही अपील केली आहे की, सरकारनं मला जबरदस्ती खायला घालावं. मी काही खाल्लं तरी काय फरक पडणारे? यातून सरकारला हाच मेसेज जाईल, की उत्तरदायित्व काही गरजेचं नाही. असे लोक उपोषणाला बसतात आणि निघून जातात." असं 15 जुलै रोजी ते म्हणाले होते.

"माझी अवस्था इतकीही वाईट नाहीये की, मी दोन-चार दिवसांत मरेन. अनेक टेस्ट्स केल्या जात आहेत. रिझल्ट्स बरेचसे नॉर्मल आहेत. आज इसीजी झाला. नॉर्मल आहे. त्यामुळे मी अनेक दिवस चालू शकतो अजून. कमकुवतपणा नक्कीच आहे, पण माझं मन अद्यापही शाबूत आहे", असंही त्यांनी सांगितलं.

कोर्टानं जनहित याचिकेवर सरकारकडून मागितलं उत्तर

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्ली हायकोर्टाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा 'जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल' घेण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचूक दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत.

कायदेशीर बातम्या आणि विश्लेषणाचे वार्तांकन करणाऱ्या 'बार अँड बेंच' (Bar & Bench) या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे.

सैनी म्हणाले की, "एक सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ता आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत, सरकारच्या अत्यंत अलोकप्रिय आणि सर्वत्र टीका होत असलेला निर्णयांच्या विरोधात आंदोलन करत आहे. एका अर्थाने, तो संपूर्ण राष्ट्रासमोर स्वतःचे प्राण पणाला लावत आहे."

न्यायालयानं सांगितलं की , या प्रकरणाचं गांभीर्य आणि तातडीने सुनावणीची आवश्यकता लक्षात घेऊन, या याचिकेवर गुरुवार, 16 जुलै रोजी सुनावणी केली जाईल.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, "केंद्र सरकारच्या वतीने कुणीही उपस्थित नाही. आम्ही या याचिकेवर सुनावणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण उद्यासाठी सूचीबद्ध करू आणि केंद्र सरकारकडून सूचना मागवू."

'मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे'

"मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे."

बीबीसी न्यूजने जेव्हा सोनम वांगचूक यांना सोमवारी (13 जुलै) भेट दिली तेव्हा त्यांनी हे सांगितले. उपोषणाच्या 16 व्या दिवशी त्यांनी बीबीसी न्यूजला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी आंदोलनाबाबतचा निर्धार सांगितला.

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार वांगचूक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालं. त्यांचं ब्लडप्रेशरही (रक्तदाब) 109/70 इतकं आहे.

त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हजारो लोकांनी त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं.

परंतु, 59 वर्षीय वांगचूक हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. "मी सुरू केलेलं काम त्याच्या शेवटापर्यंत नेणार आहे," असं ते म्हणाले होते.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलं आहे. ही संघटना भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, मे महिन्याच्या सुरुवातीला मेडिकल प्रवेश परीक्षेचे (नीट) पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे.

परंतु, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. तसेच सीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना त्यांनी 'देशात गोंधळ माजवणाऱ्या (विघातक) शक्तींची बी-टीम' म्हटलं. देशाच्या प्रगतीवर त्यांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

लडाखचे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक 28 जूनपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तेव्हापासून ते बेमुदत उपोषणावर आहेत.

स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी मानणारे सोनम वांगचूक म्हणतात की, त्यांचा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाच्या विचारांवर विश्वास आहे. उपोषणाच्या माध्यमातून सरकारची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

कोण आहेत सोनम वांगचूक?

'सोनम सर' म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचूक हे लडाखमधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही झालं आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सोनम वांगचूक यांनी लडाखला हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करता यावा, यासाठी अनेक उपाय सुचवले आणि विकसित केले.

सोनम वांगचूक 'आइस स्तूप' या संकल्पनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. हा बौद्ध स्तूपापासून प्रेरित शंकूच्या आकाराचा कृत्रिम बर्फाचा स्तूप आहे. हिवाळ्यात तो पाणी साठवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला गरज असताना तेच पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो.

59 वर्षीय सोनम वांगचूक हे मागील दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 59 वर्षीय सोनम वांगचूक हे मागील दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

सोनम वांगचूक यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात 2018 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराचाही समावेश आहे. हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

2009 मध्ये आलेल्या सुपरहिट 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा सोनम वांगचूक हेच होते. 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातही ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचूक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले. सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली.

सोनम वांगचूक निर्णयावर ठाम

दिल्लीत सध्या प्रचंड उकाडा आणि दमट हवामान असूनही, शेकडो लोक दिवस-रात्र जंतर-मंतरवर येऊन सोनम वांगचूक आणि सीजेपीला पाठिंबा देत आहेत.

अभिजीत दीपके यांनी सोमवारी बीबीसीला सांगितलं की, "आज (सोमवारी) त्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस आहे. त्यांची रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी झाले आहेत. जेव्हा जेव्हा ते बसण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना तीव्र चक्कर येते."

ते म्हणाले, "त्यांना वॉशरूमपर्यंत चालत जाणंही कठीण झालं आहे. त्यांना खूप त्रास होत आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना उपोषण सोडण्यास सांगतो, तेव्हा ते मला रागावतात आणि 'माझी काळजी करू नकोस,'" असं म्हणतात.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Geeta Pande/BBC

फोटो कॅप्शन, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.

अभिजीत दीपके यांच्या मते, डॉक्टरांनीही सोनम वांगचूक यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दीपके म्हणाले, त्यांना दररोज हजारो संदेश येत आहेत. त्यात अनेक जण वांगचूक यांना उपोषण सोडण्यासाठी समजावून सांगण्याची विनंती करत आहेत.

"परंतु, सोनम वांगचूक अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत."

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी म्हटलं आहे की, जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत सरकारकडून जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत."

वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता

जंतर-मंतरवर उपस्थित असलेले अनेक लोकही आता वांगचूक यांना उपोषण थांबवण्याची विनंती करत आहेत. त्यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून ते चिंतेत आहेत.

हैदराबादमधील 29 वर्षीय अभियंता अनिमेष साहू म्हणाले, "मी त्यांचे व्हीडिओ पाहतच मोठा झालो आहे. त्यांच्याशी माझं भावनिक नातं आहे. त्यांच्या प्रकृतीची खूप चिंता वाटते. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे."

जंतर-मंतरवर उपस्थित असलेले अनेकजण आता त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जंतर-मंतरवर उपस्थित असलेले अनेकजण आता त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन करत आहेत.

शेतकरी सत्यप्रकाश भारद्वाज यांनी वांगचूक यांना 'हिरा' म्हटलं. ते म्हणाले, "नव्या पिढीसाठी ते स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार आहेत. त्यांनी आता उपोषण थांबवावं, अशी मी विनंती करतो. ते निरोगी राहिले तरच आपल्या मुलांसाठी पुढे लढू शकतील."

शिक्षणतज्ज्ञ प्रा. नंदिता नारायण म्हणाल्या, "सार्वजनिक जीवनात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करावं लागणं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे."

त्यांनीही वांगचूक यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन करताना म्हटलं की, "त्यांच्या जीवाला धोका आहे. ही चळवळही दीर्घकाळ चालणार आहे. आंदोलनही दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जिवंत राहून या संघर्षाचं नेतृत्व करणं खूप आवश्यक आहे."

संसदेवर मोर्चा काढणार

वांगचूक यांनी उपोषण सुरू केल्यापासून विविध राजकीय पक्षांचे खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांची भेट घेण्यासाठी जंतर-मंतरवर येत आहेत.

परंतु, अभिजीत दीपके म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा एकही नेता अद्याप जंतर-मंतरवर आलेला नाही. तसेच सरकारकडूनही चर्चेसाठी कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही.

ते म्हणाले, "सरकार देशातील नागरिकांच्या मागणीकडे इतक्या सहजपणे दुर्लक्ष का करत आहे, हे समजत नाही. आम्ही फक्त जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहोत."

"आम्हाला किंवा सोनम वांगचूक यांना शिक्षणमंत्री करा, अशी आमची मागणी नाही. केवळ उत्तरदायित्व निश्चित केले जावे आणि परीक्षा योग्य प्रकारे घेण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली जावी, एवढीच आमची मागणी आहे."

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. (फाइल फोटो)

सरकार चर्चेसाठी पुढे आले नाही, तर आम्हीच सरकारकडे जाऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशनही याच दिवशी सुरू होणार आहे.

दीपके म्हणाले, "आम्ही गेल्या 24 दिवसांपासून येथे बसलो आहोत आणि सोनम सर गेल्या 16 दिवसांपासून उपोषणावर आहेत. तरीही सरकारने ना हस्तक्षेप केला, ना चर्चेला सुरुवात केली. त्यामुळे आता आम्हीच संसदेत जाऊन सरकारसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)