You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींच्या आंदोलनामुळे विरोधकांतच का पेटला संघर्ष? 'आप'चे काँग्रेसवर गंभीर आरोप
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी मंगळवारी (21 जुलै) काँग्रेसवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला.
'आप'च्या नेत्यांचं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनाची मोदी सरकारने लगेच दखल घेतली.
परंतु, जंतर-मंतरवर सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून (सीजेपी) अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे मात्र सरकारने सातत्याने दुर्लक्ष केलं.
आम आदमी पक्षाची स्थापना काँग्रेसविरोधातूनच झाली होती. दिल्लीत या पक्षाने काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचलं. पण, 2013 मध्ये अरविंद केजरीवाल पहिल्यांदा काँग्रेसच्या पाठिंब्यानेच दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते.
2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 31, आम आदमी पक्षाने 28 आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते.
परंतु, आम आदमी पक्षाला आता काँग्रेस-भाजपमध्ये काहीतरी शिजतंय असं वाटत आहे.
'आप'च्या विरोधावरून टीका का होत आहे?
'आप'चे खासदार संजय सिंह यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये आरोप केला की, सीजेपीचं आंदोलन कमकुवत करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना धरणे आंदोलनाला बसवलं.
संजय सिंह यांनी पुढे लिहिलं की, "देशातील कोट्यवधी युवकांच्या प्रश्नांसाठी सोनम वांगचूक गेल्या 23 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. जंतर-मंतरवर देशभरातील युवक आंदोलन करत आहेत."
"20 जुलैला आंदोलन करणाऱ्या तरुणांना निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. काँग्रेस गेल्या महिनाभरापासून या आंदोलनावर टीका करत आहे. आता राहुल गांधी जंतर-मंतर येथे येण्याऐवजी आमच्या धरणे आंदोलनात या, असं म्हणत आहेत."
"काँग्रेसला तरुणांचं आंदोलन कमकुवत का करायचं आहे? काँग्रेस जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन का करत नाही?"
संजय सिंह यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
गीतकार, अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी लिहिलं की, "आज तुम्हीच म्हणालात की संसद कोणा एकाची नाही. तसंच हे आंदोलनही कोणाच्या मालकीचं नाही. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे."
"तुम्हीही त्यांच्यासोबत उभे राहा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? इथेही लढा, तिथेही लढा. आणि काळजी करू नका. आपण त्या मुलांसाठी लढत नाही, ते आपल्या सर्वांसाठी लढत आहेत."
टीएमसीचे खासदार कीर्ती आझाद यांनी तर, "संजय सिंह, तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तुमच्यामुळे मला आपल्या मैत्रीची लाज वाटली," अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आणि 'आप'च्या नेत्या आतिशी सिंह यांनीही दोन्ही आंदोलनांची तुलना केली.
त्यांनी म्हटलं की, सीजेपी आणि सोनम वांगचूक यांच्या महिनाभर चाललेल्या आंदोलनादरम्यान सरकारने चर्चेलाच नकार दिला. परंतु, राहुल गांधींच्या आंदोलनानंतर अवघ्या एका तासात काँग्रेसशी संवाद साधण्यास सुरूवात केली.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये आतिशी यांनी म्हटलं की, "संसद मार्चदरम्यान सीजेपीच्या आंदोलकांना 100 मीटरही पुढे जाऊ न देणाऱ्या दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ दिलं. काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याचा हा पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला."
आम आदमी पक्ष राहुल गांधींच्या आंदोलनाला विरोध का करत आहे? यावर पंजाब विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आशुतोष कुमार म्हणतात की, "अरविंद केजरीवाल आता स्वतःला केवळ दिल्लीचे नव्हे, तर देशपातळीवरील नेते मानतात. अशा परिस्थितीत त्यांना सर्वात मोठं राजकीय आव्हान राहुल गांधींकडूनच मिळू शकतं. त्यामुळे राहुल गांधींना विरोध करणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही."
ते पुढे म्हणतात, "2014 मध्ये केजरीवाल मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढले. त्यामागे त्यांना संदेश द्यायचा होता की, मोदींना आव्हान देण्याची ताकद केवळ त्यांच्यातच आहे. परंतु, विरोधकांमध्ये फूट पडली, तर त्याचा फायदा केजरीवालांनाही होणार नाही, हे केजरीवाल यांनी समजून घ्यायला हवं."
'आप'च्या मते काँग्रेस-भाजपमध्ये 'हातमिळवणी'
लेखक आणि काँग्रेसचे माजी नेते संजय झा यांनी या पोस्टवरून आतिशी यांना चांगलंच धारेवर धरलं.
संजय झा यांनी एक्सवर लिहिलं, "आम आदमी पक्षाची ही पोस्ट अतिशय खालच्या पातळीची आहे. त्यामुळे या पक्षाबद्दलची माझी भीती खरी ठरते. हा पक्ष कायम नव्याने उभा राहणारा एक स्टार्ट-अप पक्षच राहील, असं वाटतं. हे वक्तव्य अयोग्य आहे. यामुळे मी अत्यंत निराश झालो आहे."
काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी संजय सिंह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत लिहिलं, "तुमची इतकी चिडचिड का होत आहे? हे ट्वीट अमित मालवीय यांनी लिहिलं आहे की राघव चड्ढा यांनी?"
यामाध्यमातून त्यांनी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि 'आप'मधून भाजपमध्ये गेलेल्या राघव चड्ढा यांच्यावर निशाणा साधला.
त्यानंतर अमित मालवीय यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली.
त्यांनी लिहिलं, "आता हे स्पष्ट झालं आहे की, हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नव्हतंच. प्रभावित विद्यार्थ्यांपैकी एकालाही व्यासपीठावर बोलण्याची संधी देण्यात आलं नाही. राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षांचे नेते सातत्याने जंतर-मंतरवर जात होते. आता काँग्रेस आणि 'आप' या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी एकमेकांशीच भांडत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने केवळ भाजप उभा आहे."
आतिशी यांनी असाही आरोप केला की, माध्यमांनी राहुल गांधींच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. परंतु, सीजेपी आणि सोनम वांगचूक यांच्या उपोषणाकडे मात्र दुर्लक्ष केलं होतं.
आतिशी यांनी एक्सवर लिहिलं, "महिनाभर चाललेल्या सीजेपीच्या आंदोलनाला गोदी मीडियाने एक मिनिटही दाखवलं नाही. पण राहुल गांधींच्या एका तासाच्या आंदोलनाचं मात्र थेट प्रक्षेपण दाखवलं."
"याचा अर्थ स्पष्ट आहे, राहुल गांधींना टीव्हीवर दाखवण्याचे निर्देश भाजपकडून आले असावेत, असं दिसतं. गोदी मीडियाने भाजप आणि काँग्रेसमधील हातमिळवणी उघड केली आहे."
परंतु, आम आदमी पक्षाची ही भूमिका अनेकांना पटलेली नाही.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आतिशी यांना उत्तर देताना लिहिलं, "कृपया हा निरर्थक वाद थांबवा. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामधील भांडणात आम्हाला कोणताही रस नाही. हा मुद्दा त्यापेक्षा खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. युवकांना कोणत्या पक्षाशी देणंघेणं नाही. अशा प्रकारचं राजकारण करून तुम्ही केवळ नरेंद्र मोदी आणि भाजपलाच मदत करत आहात."
काँग्रेस आणि 'आप'चे संबंध
2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी वचन दिलं होतं की, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, तरी ते काँग्रेस किंवा भाजपसोबत सरकार स्थापन करणार नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या मुलांची शपथही घेतली होती.
केजरीवाल म्हणाले होते, "मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की, मी भाजप किंवा काँग्रेससोबत जाणार नाही. कारण दिल्लीतील जनता या दोन्ही पक्षांविरोधात आम आदमी पक्षाला मतदान करेल."
"भाजप आणि काँग्रेस एकमेकांसोबत सरकार स्थापन करू शकतात, कारण पडद्यामागे ते एकच आहेत. मला सत्तेची हाव नाही. भाजप किंवा काँग्रेससोबत सरकार बनवून भ्रष्टाचार नष्ट करता येणार नाही. त्यामुळे अशा सरकारमध्ये सहभागी होण्यापेक्षा आम्ही विरोधी पक्षात बसणं पसंत करू."
2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपला 31, आम आदमी पक्षाला 28 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केलं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते.
काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचं की नाही, याचा निर्णय दिल्लीतील जनतेचं मत जाणून घेतल्यानंतरच घेऊ, असंही केजरीवाल यांनी तेव्हा सांगितलं होतं.
त्यावेळी आम आदमी पक्षाने सांगितलं होतं की, दिल्लीतील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी 280 बैठका आयोजित केल्या होत्या. त्यापैकी पहिल्या दोन दिवसांत 128 बैठका झाल्या. या 128 बैठकींपैकी 110 बैठकींमध्ये लोकांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दिल्याचा दावा 'आप'ने केला होता.
या दाव्याच्या आधारावरच आम आदमी पक्षाने काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला आणि 28 जागांच्या बळावर सरकार स्थापन केलं होतं.
'आप'च्या सोशल मीडिया टीमचे माजी रणनीतीकार अभिजीत दीपके हे सीजेपीचे संस्थापक आहेत. सीजेपीच्या आंदोलनाबाबत काँग्रेसने 2 आठवड्यांहून अधिक काळ जवळपास मौन बाळगलं होतं.
दीपके आणि सीजेपीच्या इतर नेत्यांनी यापूर्वीही काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी समान असली, तरी सीजेपीने काँग्रेसच्या पाठिंब्याला फारसं महत्त्व दिलं नाही किंवा त्याचा प्रचारही केला नाही.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणादरम्यान त्यांची भेट घेतली नव्हती. यावरून स्वतः वांगचूक यांनीही यावर भाष्य केलं होतं. पण, गुजरात काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवानी यांनी राहुल गांधींची बाजू मांडली होती.
याच काळात राहुल गांधी पेपरफुटी आणि नीट परीक्षेच्या मुद्द्यावर 'छात्रों की गूंज' हे अभियान चालवत होते.
अखेरीस 17 जुलै रोजी काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा जंतर-मंतरवर गेले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांची भेट घेतली. सीजेपीच्या आंदोलनात काँग्रेसने अधिकृतपणे आणि उघडपणे सहभाग घेतल्याची ही पहिलीच वेळ मानली जाते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)