You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पावसाळ्यात ट्रेकिंगला आणि धबधब्याजवळ फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी नक्की वाचा
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होताच सह्याद्री पर्वतरांग हिरवाईने नटू लागली असून ओढे-नाले, धबधबे आणि दऱ्या-खोऱ्यांमधील निसर्गसौंदर्य खुलू लागले आहे.
या रम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होतात.
मात्र, या सौंदर्यासोबत अनेक नैसर्गिक धोकेही निर्माण होत असून सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने (AMGM) स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात सह्याद्रीतील वाटा अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, कमी दृश्यमानता, वाढलेले गवत, वेगाने वाढणारे पाण्याचे प्रवाह, दरडी कोसळण्याचा धोका आणि तटबंदीवरील सैल दगड यामुळे अपघातांची शक्यता वाढते.
दरवर्षी धबधब्यांच्या प्रपाताखाली जाणे, कड्यांवरून छायाचित्रण करणे किंवा पाण्यात उतरून साहस करताना अनेक पर्यटक दुर्घटनाग्रस्त होतात, असेही महासंघाने नमूद केले आहे.
राज्यातील विविध गिर्यारोहण संस्था आणि स्वयंसेवक अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे बचावकार्य करत आहेत.
महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC) हे आपत्कालीन बचावकार्याचे समन्वयक केंद्र असून प्रशिक्षित स्वयंसेवक अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतकार्य करतात.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC) ची 24x7 हेल्पलाईन 7620-230-231 उपलब्ध आहे.
काळजी घेतली नाही तर अनेक अपघातही घडतात. पावसाळ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांचा अनेकदा अपघाती मृत्यू देखील होतो. मागच्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.
दोन वर्षांपूर्वी रायगडमधल्या माणगावमधील कुंभे धबधब्याजवळ आनवी कामदारचा दरीत पडून मृत्यू झाला होता. हा धबधबा त्यावेळी एका चित्रपटामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मुंबईला राहणारी आनवी 16 जुलै 2024 रोजी इथे मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी आली होती. 27 वर्षीय आनवी स्वतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
धबधब्याच्या समोर असलेल्या कड्याच्या टोकाकडे अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
त्याआधी लोणावळ्याजवळ भुशी धरणाजवळील एका धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोक वाहून जाण्याची घटना घडली होती.
2023मध्ये पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगडावरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
रविवार असल्याने गडावर प्रचंड गर्दी झाली. गर्दी इतकी होती की,महादरवाज्याजवळ पर्यटक जवळपास चार तास अडकून पडले होते. लोहगडावर पावसाळ्यात होणारी ट्रेकर्सची गर्दी आता दरवर्षी बातम्यांचा विषय झाली आहे.
तिथे साधी सरकायलाही जागा मिळत नाही आणि पर्यटक बऱ्याचदा अडकून पडतात. ही एकमेव घटना नाही. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांहून सातत्याने अशाप्रकारच्या घटना समोर येतात.
काही ठिकाणी तर पर्यटक बेपत्ता होणे किंवा त्यांना इतर धोका निर्माण होण्यासंदर्भातल्या घटनाही समोर येतात. अशा परिस्थितीमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच काही काळजी बाळगणंही गरजेचं आहे.
या संदर्भात बीबीसी मराठीने बचाव कार्य करणारे तज्ज्ञ, पर्यटन स्थळाच्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी, पर्यटक यांच्याशी संवाद साधला. सुरक्षिततेसाठी कोणती काळजी बाळगावी यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
ट्रिप प्लॅन करताय? ठिकाण निवडताना विचार करा
फिरायला जाताना कुठे जायचं यावर विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पोहोचण्यासाठी सोपे असलेल्या ठिकाणांवर सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला प्रचंड गर्दी होते. तसंच काही अवघड ठिकाणी पोहोचणं आपल्याला शक्य आहे का किंवा तिथे सुरक्षिततेसाठी व्यवस्था आहे का यावर नक्की विचार केला जाणं आवश्यक आहे, असं गिर्यारोहक आणि बचाव टीम्सचे समन्वयक ओंकार ओक यांनी सांगितलं.
“लोहगडावर जे झालं ती काही एकच घटना नाही. सुट्टीच्या दिवशी, पटकन पोहोचता येणाऱ्या ठिकाणांवर प्रचंड गर्दी दिसते. काही ठिकाणी तर पोहोचतानाच ट्रॅफिक जॅमही होतं.
पावसाळ्यात गर्दी टाळणं हे कधीही श्रेयस्करच असतं. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी किंवा जास्त एडव्हेंचर म्हणून दुर्गम ठिकाणी, एकांताच्या ठिकाणी अनुभव नसताना जाणं धोकादायक ठरू शकतं.
एखाद्या किल्ल्यावर पोहोचणं आपल्याला झेपणार आहे का, याचाही विचार केला पाहिजे. थ्रिलसाठी न झेपणाऱ्या गोष्टी टाळणं कधीही योग्य आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी फिरायला जायचा विचार आहे, तिथली माहिती काढणे, तिथल्या सोयी, सुविधा आणि काय काय तयारी लागेल याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे,” असं ओंकार ओक यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
‘आपण कुठे फिरायला जातोय याची कुणाला तरी कल्पना देणं आवश्यक’
फिरायला जाताना प्लॅनिंग करताना कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीला त्याची कल्पना देऊन ठेवणं आवश्यक असल्याचं ओंकार ओक यांनी सांगितलं.
“हल्ली आम्ही हे पण सांगतो की, तुम्ही कुठे जाताय हे घरी सांगायचं नसेल, किंवा घरी त्याची कल्पना द्यायची नसेल तरीही कोणालाही न सांगता जाऊ नये. खरंतर घरच्यांना माहिती द्यावी. पण ते जर शक्य नसेल तर जवळच्या कुणाला तरी मग मित्र-मैत्रिणी असोत, नातेवाईक असोत किंवा शेजारी असोत कुठे जातोय, कुणासोबत जातोय याची कल्पना असणं आवश्यक आहे.
"त्याच सोबत त्यांना हे पण सांगून ठेवलं पाहिजे की,जर 24-48 तासांत माझ्याशी संपर्क झाला नाही तर स्थानिक बचाव टीम किंवा पोलिसांशी संपर्क करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे,” असं ओंकार ओक यांनी सांगितलं.
सेल्फी, रिल्स, फोटोच्या नादात सुरक्षिततेचा विसर नको
रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा हा भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे झालेल्या काही दुर्घटनांनंतर तिथल्या पर्यटनावर गदा आली होती. पण तेथील स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत, पर्यटकांची सुरक्षितता आणि निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी उपक्रम हाती घेतला. गेल्या सात वर्षांपासून ते पर्यटकांसाठी गाईड, आणि गार्ड म्हणून काम करत आहेत.
धबधबा, दऱ्या यांसारख्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी किंवा रिल्स बनवण्यासाठी नको ते धाडस करणं टाळायला पाहिजे असं तेथील स्थानिक अर्जुन म्हामुणकर याने सांगितलं.
“आम्ही पर्यटकांसाठी मार्गदर्शनपर सुविधा सुरु केल्याला 7 वर्ष झालेली आहेत. आम्ही रस्ता दाखवण्यापासून ते कुंडाच्या जवळ काही मदत लागली तर ती करण्यापर्यंत सगळ बघतो. कुंडाच्या जवळ एका पाइॅटनंतर कुणालाही जाऊ देत नाही. तिथे दोरखंड लावलेले आहेत. त्यामुळे सुरक्षितपणे आनंद घेता येतो. तसंच दारु पिऊन कुणी असल्यास त्यांना आम्ही पुढे सोडत नाही.
सुरक्षिततेसाठी या गोष्टी आवश्यक आहेत. तसेच पर्यटकांनीही स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. मुसळधार पाऊस असेल तर देवकुंड पर्यटकांसाठी बंदच ठेवतो,” असं अर्जुन म्हामुणकर याने सांगितलं.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडूनही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही आवाहने करण्यात आलेली आहेत.
“वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. तथापि, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासुन सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे.
जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरड्या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असुन त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत,” असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी म्हटलं.
गिर्यारोहणासाठी खास गाईडलाईन्स
ज्यांना पावसाळ्यात गिर्यारोहणाचा आनंद लुटायचा आहे, त्यांच्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना असलेले पत्रक प्रसारित करण्यात आलेलं आहे.
“अलीकडे दरवर्षी पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये, गडकोट किल्ल्यांवरती भटकंतीसाठी, ट्रेक साठी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये अनेक वेळा काही ठिकाणी सातत्याने दुर्घटना होताना पाहायला मिळत आहेत. यामधील अनेक घटनांमध्ये मानवी चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हे सर्व टाळणे सहज शक्य आहे. ही भटकंती सुरक्षित व्हावी यासाठी काही गोष्टींचं पालन आवश्यक आहे,” असं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितलं.
गिर्यारोहकांसाठी गिर्यारोहण महासंघाकडून खास टिप्स :
- ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे
- ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी
- ग्रुप कडे First Aid चे साहित्य असावे.
- ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ग्रुप यांची माहिती घरी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
- ट्रेक मध्ये First man व Last man यांच्या मध्येच चालावे
- ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी
- आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
- पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
- पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी
- किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो
- walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे मुळे चढणे, उतरणे व चालणे सोपं होतं
- शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे
- आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा
- अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे
- शहरी गोंगाट या ठिकाणी करू नये
- किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा
- पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये. धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
- डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)